रत्नागिरी :- रत्नागिरी शहरातील मारुतीमंदीर ते नाचणे या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या इलेक्ट्रीक कारने पाच दुचाकींना ठोकर दिली . यामुळे या गाड्यांसह कारचे मोठे नुकसान झाले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडला. रत्नागिरी शहरात मारुती मंदिर कडून नाचणेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दर्शन जैन याच्या ताब्यातील एमएच ०८ एएस ६५५० या कारने एमईसीबी कार्यालय समोरील गॅरेजसमोर प्रथम दुचाकीस्वारांना धडक दिली . त्यानंतर पुढे जाऊन एका भाजी दुकानाला धडक देत गाडी गेल्याने मोठे नुकसान झाले व त्या ठिकाणी असणाऱ्या एमएच ०८ एएच १४३७ , एमएच ०८ एई ४७५२ यांना ठोकर दिली . त्यामुळे या गाड्यांचेही व भाजीपाला विकणाऱ्या महिलेचेही नुकसान झाले आहे . यात भाजी विक्रेती महिलाही जखमी झाली . त्यानंतर पुढे जात एमएच ०८ एवाय ९१५८ तसेच एमएच ०८ एटी १३०२ आणि एमएच ०८ वाय १११८ या दुचाकींना धडक दिली . यामध्ये सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून भरधाव जाणारी ही इलेक्ट्रीक कार विद्युत खांबावर जाऊन धडकली . ही धडक एवढ्या जोरात होती की तिचे पुढचे चाक बाहेर पडले . तर एअर बॅगही फुटून पुढे आली, त्यामुळे चालकाचे प्राण थोडक्यात वाचले . या भीषण अपघातानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली . वाहतूक पोलिसांनी तत्परतेने तेथे धाव घेतली . तसेच रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची संपूर्ण टीम वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कामाला लागली . या अपघातानंतर एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती .