
मुंबई: कांदा, भाजीपाला, मिरची, कापसाची बाजार भावातील चढउतार, शेतकरी आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या बाजार समित्या सध्या निवडणुकीमुळे चर्चेत आहे. कोरोना आणि इतर कारणानं लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे निकाल हाती येणार आहेत.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा नुकताच शांत झाला, ग्रामपंचायत पाठोपाठ ग्रामीण भागाची नाळ जुळवून ठेवणारी निवडणूक म्हणून बाजार समतीच्या निवडणुकीच्या निवडणुकीकडे बघितले जात आहे. ग्रामीण भागावर वर्चस्व ठेवायचे असेल तर बाजार समिती ताब्यात ठेवली जात. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती राहिल्या आहेत. ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असल्याने बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप पुढे सरसावली असल्याने महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती अशा लढती दिसत आहेत. बाजार समितीमध्ये रोज हजारो शेतकरी येत असतात, रोज होणारी लाखो कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यानिमित्ताने शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी फायद्यात ठरते.
