☯️उन्हाळ्यात आरोग्य संवर्धन करणारे धणे

Spread the love

प्रभू रामचंद्राचा जन्म असो किंवा कृष्णजन्म सोहळा असो, सुंठवडा तर पाहिजेच न! धनत्रयोदशीला, आरोग्य देवता धन्वंतरी यांच्या जयंतीला देखील प्रसाद म्हणून, धणे व गुळाची निवड केली आहे. पावसाळा असो, हिवाळा असो, नाहीतर उन्हाळा असो, सर्व ऋतूतील आरोग्य सखा असे धण्याला म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे कारण आहे सर्व ऋतूत शरीरातील त्रिदिषांचा समतोल राखण्याचे सामर्थ्य धण्यांमध्ये आहे. यातील असंख्य गुणांमुळे धण्यांना शुभ समजले जाते व अनेक शुभप्रसंगी, धण्याचा गुळाबरोबर वाटून, नैवेद्य दाखवला जातो. उन्हाळ्यात तर धण्यांचा स्वास्थ्य राखण्याबरोबर, रोग निवारणासाठी देखील उत्तम फायदा होतो. हे फायदे मिळण्यासाठी नवीन धणे वापरावे. त्याच्या एक एक गुणाचा उलगडा करूया:

तृष्णानाशक:
वाढत्या उष्णतेने व घामाचे प्रमाण वाढल्याने उन्हाळ्यात तहान जास्त प्रमाणात लागते. विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना, शरीरात उष्णता जास्त असल्याने, प्रमाणाबाहेर तहान लागते. धणे पित्ताचे शमन करतात व अति प्रमाणातील तृष्णा कमी करतात. यासाठी उकळी आलेल्या पाण्यात भरडलेले धणे भिजवावे. काही तासांनी ते गाळून त्यात खडीसाखर घालून हे पाणी वारंवार प्यावे.

ज्वर:
धणे उत्तम ज्वरनाशक आहेत. याने ताप कमी होण्यास मदत होते. तापामध्ये लागणारी तहान, वर सांगितलेल्याप्रमाणे धण्याच्या पाण्याने, नियंत्रणात येते. यात बेदाणे घातल्यावर जास्त फायदा होतो. तापानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी देखील या पाण्याचा फायदा होतो.

दाह:
उष्णतेमुळे किंवा पित्तामुळे पोटात होणारा दाह धणे व खडीसाखर खाल्ल्याने कमी होतो. धणे शरीरातील उष्णता कमी करतात. हिरवे धणे विशेषतः दाह कमी करून शरीरात थंडावा आणतात. उन्हात गेल्यावर येणाऱ्या तापामध्ये शरीराचा दाह होतो. यावर धणे विशेष गुणकारी आहेत.

उन्हाळी लागणे:
उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या या त्रासासाठी धण्याचे पाणी हा खात्रीशीर उपाय आहे. उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने किंवा पाण्याचे प्रमाण कमी पडल्याने लघवीला वारंवार होते, वेदना होतात व आग होते. धण्याने उष्णता कमी होऊन लघवीचे प्रमाण वाढते. याने आग कमी होते. वरचेवर होणारी लघवी व वेदनायुक्त मूत्रप्रवृत्ती ही लक्षणे त्वरित कमी होतात. मूत्रमार्गाच्या इतर तक्रारीत देखील धणे व कोथिंबीरीचा आहारात समावेश करावा.

पचन कार्य:
उन्हाळा म्हणजे वर्षभराचे पदार्थ करण्याचा ऋतू. यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मसाले. भोजनातील विविध पदार्थांबरोबर, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लागणारे विविध मसाले, जसे काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला हे धण्याशिवाय होत नाहीत. मसाल्यातील प्रमुख घटक असल्याचे कारण असे की धणे पचनासाठी मदत करतात व भूक वाढवतात. त्याचबरोबर यातील स्निग्धतेने व उष्णता कमी करण्याच्या गुणाने, मसाल्यातील इतर उष्ण व तीष्ण पदार्थांचा समतोल राखला जातो. धण्याला एक प्रकारचा सुगंध असल्याने, मसाल्याव्यतिरिक्त केवळ धण्याची पूड देखील पदार्थांमध्ये घालण्याची पद्धत आहे. ज्यांना मसाल्याने त्रास होतो, त्यांच्या अन्नाला उत्तम चव व गंध देण्याचे काम या धण्यातील सुगंधी तेलामुळे होते.

मधुमेह:
धण्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पित्त प्रकृती असलेल्या मधुमेहींनी आहारात धण्याचा वापर अवश्य करावा.
प्रत्येक घरात स्वयंपाकघरात धणे असतात. गरज आहे त्याचा कुशलतेने वापर करून आरोग्य संवर्धन करण्याची! धण्याचे गुणधर्म समजल्यावर, उन्हाळ्यात आरोग्य संरक्षण व रोग निवारणासाठी याचा वापर आपण सगळे आवश्यक कराल याची मला खात्री आहे!

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page