
▶️काही महिन्यांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार असा प्रश्न विचारला जात असताना आता राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
▶️सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ओबीसी आरक्षण, प्रभागरचना या याचिकांवर येत्या तीन महिन्यात निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच नगरपालिका, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा प्रश्न मार्गी लागेल, असे सावे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
▶️न्यायालयात ऑगस्ट 2022 पासून ओबीसी आरक्षण, प्रभागरचनेच्या संबंधित याचिका प्रलंबित आहेत. सुनावणीसाठी तारीख उपलब्ध होत नसल्याने उशीर होत आहे. सुनावणी कधी होईल सुनावणी झाल्यानंतर निकाल काय येईल यावरच पुढील घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे कदाचित पावसाळ्यानंतरच निवडणुका होतील अशी शक्यता असल्याचे सावे म्हणाले.
▶️सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासह महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रभाग रचनेला आव्हान देण्यात आले आहे. या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयात सुनावणी होऊन निकाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल. न्यायालयाने जर प्रभाग रचना कायम ठेवली तर निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
▶️सावे यांनी म्हटल्याप्रमाणे तीन महिन्यात निकाल लागला तर निवडणुका होऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत सर्व काही न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असल्याचे दिसते. त्यामुळे सुनावणी होऊन कधी निकाल लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.