जनशक्तीचा दबाव न्यूज
अहमदाबाद*-भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामना अनिर्णीत राहिला आणि त्याचबरोबर टीम इंडियाने २-१ अशी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खिशात घातली. मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता. सोमवारी (१३ मार्च) दोन्ही संघांतील हा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. हा सामना जरी अनिर्णीत राहिला तरी देखील भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थान निश्चित केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या आणि जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. यानंतर भारतीय संघानेही जवळपास दोन दिवस फलंदाजी करत ५७१ धावा केल्या. त्यानंतरच हा सामना अनिर्णित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून १७५ धावा केल्या. यानंतर कर्णधार आणि सामनाधिकारी दोघांनीही सामना बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत हा सामना नियोजित वेळेच्या जवळपास दीड तास आधी संपला.