
अकलपे-खेड एसटी बस घाटातच अडकली; विद्यार्थी, महिला व प्रवाशांचे हाल, १५ ते २० गावांचा संपर्क विस्कळीत..
खेड दि. ४ सप्टेंबर : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात गुरुवार दि. 3 सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा मोठी दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. डोंगर उतारावरील माती, दगड आणि मोठमोठ्या शिळा रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा बंद झाली असून, घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यालगतच्या सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी असलेला संपर्क विस्कळीत झाला आहे.
रघुवीर घाट हा सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. घाटमाथ्यावरील अनेक गावांतील नागरिक शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ तसेच विविध कामांसाठी खेड शहरात ये-जा करत असतात. मात्र, दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे या गावांतील नागरिकांची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी अकलपे-खेड एसटी बस सकाळपासूनच अडकून पडली आहे. या बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि इतर प्रवासी असल्याने त्यांना घाटातच थांबावे लागले आहे. रस्ता पूर्णपणे बंद असल्याने बस पुढे किंवा मागे घेणे शक्य झालेले नाही. घाटमाथ्यावरील गावांमधून खेडकडे शाळा, महाविद्यालय आणि इतर कामांसाठी निघालेल्या प्रवाशांनाही दरड कोसळलेल्या ठिकाणीच थांबावे लागले आहे.
दरम्यान, दरड हटविण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावर कोसळलेले दगड आकाराने मोठे असल्याने ते केवळ जेसीबीच्या साहाय्याने हटविणे कठीण जात असून त्यामुळे मोठ्या दगडांचे तुकडे करण्यासाठी ब्रेकरच्या साहाय्याने काम करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समोर येत आहे.
मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी रस्ता पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात रघुवीर घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरड कोसळल्यानंतर केवळ मलबा हटविण्याऐवजी घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरड कोसळल्यामुळे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली असून, घाटमाथ्यावरील गावांतील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अडकलेल्या एसटी बसमधील प्रवासी आणि इतर नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने दरड हटविण्याचे काम अधिक वेगाने करून रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर