
माजी राज्यपाल आणि शिक्षणसम्राट डी. वाय. पाटील यांचं निधन झालंय…
कोल्हापूर- देशासह जगभरात आणि महाराष्ट्रात 180 हून अधिक शिक्षण संस्था तसेच विद्यापीठ स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारे शिक्षण सम्राट आणि बिहार, पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी वयाच्या 90 व्या वर्षी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी 11 ते 4 या वेळेत त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तर सायंकाळी चार वाजता कोल्हापुरातील कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थान येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. कोल्हापुरातील लाईन बाजारमधील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजकारणापेक्षा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम :
शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणारे डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याचीही संधी मिळाली, मात्र त्यांनी राजकारणापेक्षा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम करून देश आणि देशाबाहेर विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे उभी करून शिक्षणाची गंगा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कोल्हापूरसह पुणे मुंबई या ठिकाणी डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने स्थापन करण्यात आलेली विद्यापीठं, कृषी महाविद्यालये, मेडिकल कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेजच्या शैक्षणिक जाळ्यामधून जपानमध्येसुद्धा विद्यापीठ स्थापन करून डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाचा डंका जगभर गाजवला. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, मात्र ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
तीन राज्यांची राज्यपाल पद भूषवणारे डॉ. डी वाय पाटील :
प्रदीर्घ काळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षात काम केल्यानंतर डॉ. पद्मश्री डी. वाय. पाटील यांना त्रिपुरा, बिहार आणि त्यानंतर पश्चिम बंगाल राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ती सक्षमपणे पेलली, राज्यातील तीन राज्यांचा राज्यपाल म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
कोल्हापूर शहराचे महापौर ते राज्यपाल असा देदीप्यमान प्रवास :
डॉ. डी. वाय. पाटील यांनी 1957 ते 1962 या काळात कोल्हापूर शहराचे महापौर म्हणून काम केले होते, त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून 1967 ते 1972 या काळात आमदार म्हणून मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करत तळागाळातील जनतेला न्याय मिळावा, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विधानसभेत आवाज उठवला होता. काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख संजय पाटील यांचे ते वडील, तर कोल्हापूर दक्षिण विधानसभेचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे ते आजोबा आहेत.
पाटलांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी :
शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने काळाने हिरावून नेले, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय. डॉ. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झालीय, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलंय. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे दोनशे संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थी, असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला.
वैद्यकीय सोयी सुविधा आणि आरोग्य सेवेचे जाळे विस्तारले :
या महाविद्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी सुविधा आणि आरोग्य सेवेचे जाळे विस्तारले. राजकारणातही त्यांनी काम केले. ते दोनदा विधानसभा सदस्य होते. पण डॉ. पाटील रमले शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात. यातून त्यांनी अनेक भव्य दिव्य अशी शैक्षणिक संकुले, डॉ डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे प्रकल्पही साकारले. डॉ. पाटील हे सहकार, शिक्षण, सांस्कृतिक – साहित्यिक आणि सामाजिक चळवळीचे आधारवड होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली. ‘अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन’ हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे प्रतिबिंब होता.
त्यांच्या जाण्याने एका दूरदर्शी शिक्षणमहर्षीचा अंत झाला :
आज त्यांचे पार्थिव अस्तित्व आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या जाण्याने एका दूरदर्शी शिक्षणमहर्षीचा अंत झाला असला, तरी त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्याशी निगडित अनेक समुह, संस्थांवर शोकमग्न झाल्या आहेत. डॉ. पाटील यांच्या परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे, या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
देशातील उच्च शिक्षणाला एक नवी दिशा दिली :
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही डी. वाय. पाटलांना श्रद्धांजली अर्पण केलीय. महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे महान शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि शैक्षणिक विश्वावर शोकाकळा पसरल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. केवळ संस्था उभ्या न करता, ‘Academic Excellence’ आणि ‘Holistic Education’ या तत्त्वांवर आधारित शिक्षण देऊन त्यांनी देशातील उच्च शिक्षणाला एक नवी दिशा दिली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर अशा 16 हून अधिक विद्याशाखांमध्ये 146 हून अधिक अभ्यासक्रम चालवले जातात. संपूर्ण देशात तब्बल 7 स्वतंत्र विद्यापीठे उभी करण्याचा अद्वितीय आणि ऐतिहासिक विक्रम त्यांच्याच नावावर आहे. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये त्यांनी उभारलेली रुग्णालये लाखो रुग्णांसाठी वरदान ठरली आहेत.
‘डी. वाय. पाटील स्टेडियम’ उभारून क्रीडा विश्वात नवा वस्तुपाठ :
तसेच नवी मुंबईत जगातील 6 व्या क्रमांकाचे अत्याधुनिक ‘डी. वाय. पाटील स्टेडियम’ उभारून त्यांनी क्रीडा विश्वात एक नवा वस्तुपाठ निर्माण केला. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी आपल्या पदाची गरिमा वाढवली. एक संस्था उभी करणे सोपे असते, पण ती निष्ठेने, शिस्तीने आणि सामाजिक भान ठेवून चालवणे अत्यंत कठीण असते; डी. वाय. पाटील साहेबांनी ते लीलया करून दाखवले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला आहे. ईश्वर डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना! डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!, असं म्हणत शिंदेंनी श्रद्धांजली अर्पण केलीय.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी, समाजसेवक आणि अनुभवी सार्वजनिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*