फडणवीस राज्यातच राहणार, वावड्यांवर विश्वास ठेवू नका:चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, शिंदेंच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त…

Spread the love

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याच्या अफवांवर आणि वावड्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करू शकतात,” असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमासाठी बावनकुळे रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मनुष्यबळ विकास खाते सांभाळण्याचा सल्ला दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “संजय राऊत यांच्याकडे नक्की कोणता तिसरा डोळा आहे, हे मला माहित नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातच राहणार आहेत. विरोधक पसरवत असलेल्या अशा कोणत्याही वावड्यांवर नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये.”

संजय शिरसाट अन् बच्चू कडूंवर कारवाईची मागणी…

सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. “सत्तेत असताना महायुतीच्या नेत्यांनी असे वर्तन करणे पूर्णपणे अयोग्य आहे. एकनाथ शिंदे यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मात्र महायुतीत राहून त्यांच्या नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे एकनाथ शिंदे यांनीच नक्की ठरवावे,” असा सल्ला त्यांनी दिला.

▪️रत्नागिरीत महसूलमंत्र्यांच्या ४ मोठ्या घोषणा..

*रत्नागिरीच्या भूमीत पार पडलेल्या महाराजस्व समाधान शिबिरात बोलताना महसूलमंत्र्यांनी शेतकरी, कोतवाल आणि जमिनींच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.*

*कोतवालांना तलाठी भरतीमध्ये २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली.*

*जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी “आधी मोजणी आणि नंतरच नोंदणी” असा नवीन कायदा सरकार आणत आहे. जमिनीची अधिकृत मोजणी केल्याशिवाय कोणतेही रजिस्ट्रेशन होणार नाही.*

*राज्यातील शेतकऱ्यांना यापुढे कृषी पंपाचे बिल भरावे लागणार नाही. तसेच शेतमजूर महिलांनाही ‘शेतकरी’ दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.*

*देवस्थान आणि इनाम जमिनींबाबतचा नवा कायदा आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून सर्वसामान्यांना न्याय दिला जाईल.*

▪️एसआयआर (SIR) मोहिमेत रत्नागिरीचा डंका..

घूसखोरी आणि मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठी सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेत चिपळूण मतदारसंघ राज्यात प्रथम आला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल त्यांनी महसूल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page