
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी रत्नागिरी शहरात संतापाचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला….
रत्नागिरी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी रत्नागिरी शहरात संतापाचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, नोकरदार वर्ग आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ‘शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा’, ‘विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा’, ‘हुकूमशाही सरकारचा निषेध असो’, ‘सरकार होश में आओ’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या निषेध मोर्च्याची सुरुवात मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर रात्रीच्या अंधारात करण्यात आलेली पोलिसी कारवाई ही लोकशाही मूल्यांवर झालेला थेट आघात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी धोरणे तातडीने मागे घ्यावीत, तसेच २३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडून उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी ठाम मागणी केली. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशाराही सरकारला देण्यात आला.
मोर्चामध्ये सर्व विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संघटना, नोकरदार वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षभेद आणि मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा संदेश या मोर्चातून देण्यात आला.
हजारोंच्या सहभागाने निघालेल्या या मोर्चाने रत्नागिरीत विद्यार्थी प्रश्नांवर व्यापक जनआक्रोश निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे केली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*