
वांगचुक यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज (दि. १७) २०वा दिवस असून, डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचा इशारा दिला असतानाही त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. २० जुलै रोजी प्रस्तावित संसद मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत वांगचुक यांनी आपला निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले.
‘२० जुलैपर्यंत जिवंत राहीन’..
समर्थकांना संबोधित करताना वांगचुक म्हणाले, “मी बाहेरून अशक्त आहे, पण आतून खूप मजबूत आहे. २० जुलैला आपण लोकशाहीच्या मंदिरात शांततेच्या मार्गाने आपली बाजू मांडू. मी कोणत्याही परिस्थितीत २० जुलैपर्यंत जिवंत राहीन. जर तुम्ही आले नाही आणि मोर्चा यशस्वी झाला नाही, तर मी भूत बनून परत येईन.”
डॉक्टरांकडून गंभीर इशारा..
वांगचुक यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक टप्प्यावर पोहोचल्याचे सांगितले आहे. उपोषण सुरूच राहिल्यास शरीरात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊन अवयव निकामी होण्याचाही धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सरकारच्या प्रतिसादाशिवाय उपोषण मागे घेण्यास नकार…
सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नसताना उपोषण मागे घेतल्यास चुकीचा संदेश जाईल, असे सांगत वांगचुक यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले. आता २० जुलै रोजी होणारा संसद मोर्चा यशस्वी करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.
उच्च न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश…
दिल्ली उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकृती अधिक खालावल्यास तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
इतर उपोषणकर्त्यांचीही प्रकृती खालावली…
दरम्यान, सीपीआय (ML) लिबरेशनशी संलग्न ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) नेही आंदोलनातील नेहा, मनीष आणि आमीन या उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. निर्जलीकरणामुळे आमीन यांना हायपोव्होलेमिक शॉकचा धोका निर्माण झाला असून, नेहा यांच्या रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या घसरली आहे. मनीष यांच्या वजनातही १० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे संघटनेने सांगितले.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी…
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, परीक्षांमधील कथित अनियमिततेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, २० जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शांततापूर्ण संसद मोर्चा काढण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*