गोळप कट्टाच्या कार्यक्रमात कोकण रेल्वेचे क्षेत्रीय व्यवस्थापक शैलेश बापट यांचा सहभाग…

Spread the love

गोळप कट्टाच्या जून महिन्यातील तिसऱ्या शनिवारी ८० व्या कार्यक्रमात यावेळी मान्यवर म्हणून उपस्थित होते कोकण रेल्वेच्या सुरवातीपासून आपले योगदान देऊन आपल्या कर्तृत्वाने सध्या रत्नागिरी येथे रिजनल मॅनेजर या उच्च पदावर विराजमान असलेले श्री. शैलेश बापट…त्यांची मुलाखत घेतली श्री अविनाश काळे यांनी. मुलाखतीतून आपला प्रवास सांगताना…..

रत्नागिरी- विशेष मुलाखत-  माझं गाव केळ्ये मजगाव.. रत्नागिरी पासून १० किमी अंतरावर आहे.मूळ गाव तिथे आणि शालेय शिक्षण सगळं रत्नागिरी मध्ये झालं.केळ्ये मजगाव या गावाबद्दल अनंत आठवणी आहेत. गावात आमचं एकादशी उत्सव मंडळ म्हणून आहे ज्या मधे ५० ते ५५ जणांचा आमचा ग्रुप आहे. यात एकदा मुले आली की चांगले संस्कार मुलांवरती होतात. आमचं जे काकड आरती उत्सव मंडळ ( एकादशी उत्सव मंडळ )आहे हे जवळपास १५० वर्ष उत्सव सुरु आहे. कोजागिरी च्या दुसऱ्या दिवशी सुरवात होते पुढे एक महिना काकड आरती चालते. पहाटे ४. ४५ ते ६. ३० आरती असते.परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिर इथे माझं प्राथमिक शिक्षण झालं. ८वी पर्यंत फाटक हायस्कूलला होतो. नंतर आरोग्य मंदिरला राहायला गेल्यामुळे ९ वी, १० वी शिक्षण शिर्के हायस्कूल जवळ असल्याने तिथे झालं. नंतर वडलांनी सांगितल्यामुळे इंजिनिरिंग साठी डिप्लोमाला गेलो.

डिप्लोमाला गेलो तेव्हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी मधे ऍडमिशन एक मार्कांनी गेली. मालवणला नवीन पॉलीटेकनिक कॉलेज चालू झालं होतं. तिथे ऍडमिशन घेतली. तिथून पुढच्या वर्षी रत्नागिरी बदलून घेतलं.. १९९० साली माझा डिप्लोमा पूर्ण झाला आणि मग कोकणरेल्वे चा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला मी खन्ना कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे सुपरवायझर म्हणून कामाला होतो. गोळप येथील फिनोलेक्स फाटा ते फिनोलेक्स फॅक्टरी पर्यंत रस्ता जातो, त्या रस्त्यावर मी पहिल्यांदा सुपरव्हिजन चे काम केल.. त्यानंतर मी रत्नागिरीत विभाकर खानविलकर कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं बी एस एन एल चं काम चालू होतं. तिथे मला काम करायची संधी मिळाली. बी एस एन एलच्या मुख्य बिल्डिंगची फॉउंडेशन्स तिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. तिथे त्यांनी खऱ्या सिव्हिल इंजिनिअरिंग च्या कामाचा अनुभव मला दिला. त्या काळात कोकण रेल्वेचे चीफ इंजिनिअर श्री. कुलकर्णी होते. त्यांच्याशी बाबांचे मित्र श्री. अशोक लांजेकर यांच्याशी थोडा परिचय होता. त्यांनी सुचवलं मी इंजिनियर असल्याने एम्प्लॉईमेंट एक्सचेंज मार्फत कोकण रेल्वे मध्ये भरतीसाठी आलं तर नोकरी मिळू शकते. त्यानुसार मी केलं एम्प्लॉईमेंट एक्सचेंजमध्ये जाऊन त्यांच्यामार्फत काही इंजिनिअर ची नावे त्यांनी कोकण रेल्वेकडे दिली. त्यात माझं नाव होतं. माझा इंटरव्हयू झाला आणि मी १९९१मध्ये कोकण रेल्वेत नोकरीला लागलो. कोकण रेल्वे १९९० मध्ये सुरवात झाली. माझं पोस्टिंग संगमेश्वर येथे होतं.त्या काळात एकाचवेळी जागा अधिग्रहण, जागा संमती, सर्व्हे आणि रेल्वेची बांधणी असं सगळं सुरु होतं. सुरुवातीला सर्व्हे पॉईंट पक्के करणे. जमीनधारकांची संमती मिळवणे अशीच कामे होती. १९९२ मध्ये प्रत्यक्ष कामाना सुरुवात झाली. कॉन्ट्रॅक्टर्स आले. आमची पाटी कोरी होती. आम्ही ड्रॉईंग पाहिली होती पण कामाचा अनुभव, पूल त्यांची ड्रॉईंग, स्टील कसं हवं, फॉउंडेशन कसं, काँक्रिट कसं,मातीचा भराव वर रोलिंग कसं, बोगद्याची कामे हे सगळ्या अनुभवी कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून तसेच डिप्युटेशनवर आलेल्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला शिकवलं गेलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामे केली. शिवाय कोकण रेल्वेने काही सल्लागार स्पेशल कामासाठी घेतले होती, ते आमच्या कामाकडे लक्ष ठेवायचे. बोगद्याच्या कामासाठी अनुभवी कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या लोकांबरोबर शिकूनच आम्ही ती काम पूर्ण केली. संगमेश्वर मधील शास्त्री पूल आणि गोळवली मधील दोन पूल अश्या तीन पुलांवरती माझा बऱ्यापैकी कोकणरेल्वे मधला पाच सहा वर्षाचा कन्स्ट्रक्शन चा कालावधी झाला. शास्त्रीपूल जो आहे तो वाशीच्या जवळचा जो खाडी पूल आहे त्याच प्रोटोटाईप एक छोटं रूप आहे.कोकणरेल्वेच्या रिजन मधला हा एकमेव पूल आहे ज्यामध्ये पी एस सी बॉक्स गर्डर आणि पाईल फाऊंडेशन आहे, त्याच काम केरळची एक कंपनी जिओटेक त्यांनी केल होतं.

रोह्या पर्यंत सेंट्रल रेल्वेच अधिकार क्षेत्र आहे. रोह्यापासून पुढे सुरु होणारी कोंकण रेल्वे थोकूर मंगलोर पर्यंत अशा एकूण ७४० किमी पर्यंत धावते. भोक्याचा जो बोगदा आहे तिथे काम करायची संधी नाही मिळाली. पण मी संगमेश्वर सेक्शन ला असल्यामुळे मला साईट व्हिजिट साठी किंवा काही इमर्जन्सी असेल तर बोलावलं जायचं. सुरवातीच्या काळात कोकणरेल्वे सुरु झाल्यानंतर दरड कोसळणे हे सगळं व्हायला लागलं. पण त्याच्या आधी ज्यावेळी काम पूर्ण होत असताना साधारण १९९७ च्या आसपासची गोष्ट असेल दोन-तीन ठिकाणी मेजर लँड्स स्लाईड झाले होते एक आपल्या येथे खेडशीच्या आसपास झाला होता. त्यानंतर आमच्या शास्त्रीपुलाच्या परचूरी साईटला एक झालं होतं. ती माझी साईट होती तिथे आमच बऱ्यापैकी काम पूर्ण झाले होते आणि अशा परिस्थितीत लँड स्लाईड झाल्यामुळे पुलाच्या पाईल कॅप ला तडा गेला, चार-पाच मिलिमीटर चा क्रॅक होता, एवढा क्रॅक येणं हे खूपच सिरीयस होतं. त्यावेळी खूप गदारोळ झाला होता आमचं काम प्रामाणिक होतं मात्र लोकांनी कामावर प्रश्नचिन्ह उभं केलं. सी एम डी श्रीधरन साहेब त्यावेळी साईट वर आले होते आणि

त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आमच्या कामात काहीही कसूर नाही हे जाहीर केले. तर मागील शंभर मिटर डोंगरापासून लँडस्लाईड झाल्याने तो क्रॅक उद्भवला होता हे सिध्द केलं. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला. शिवाय त्या प्रसंगी पुढे कसे काम करायचे मार्गदर्शन केले. त्यानुसार काम झाले आणि आज तीस वर्षांनी सुद्धा त्या पुलावरून कोकण रेल्वे धावत्ये. तिथे कधी अडचण आली नाही. तो एक अतिशय लक्षात राहण्यासारखा अनुभव होता. कोकण रेल्वे सुरू झाल्यावर पहिले सहा महिने सोडले तर पुढे कायम कोकण रेल्वेत असल्यामुळे सगळ्या सीएमडी आणि एमडी यांच्याबरोबर कामाचा संबंध आला मधल्या काही काळात मी युनियन मध्ये काम केलेला असल्यामुळे त्यावेळेस सगळ्या एमडी सीएमडी बरोबर आमची भेट होत होती. पण श्रीधरन साहेब दिल्लीला गेल्यानंतर त्यावेळी आम्हाला कोकण रेल्वेचे पुढे काय? असा प्रश्न होता. त्यानंतर राजाराम साहेब आले त्यांच्या आयडिया इनोव्हेटिव्ह असायच्या आणि त्यांनी त्या सगळ्या राबवून घेतल्या. त्यांच्या पद्धतीने त्यांनी ती सगळी कामे करून घेतली. स्काय बसच त्यांच स्वप्न होतं आणि ते उभं राहिलं होतं पण पुढे काही कारणाने तिथे एक अपघात झाला आणि ते काम थांबवावं लागलं पूर्ण होऊ शकलं नाही. पण आता परदेशामध्ये तोच स्काय बसचा प्रोजेक्ट अभिमानाने लोक चालवतायत. असे राजाराम साहेब होते. कोकण रेल्वेच बेसिकली जे कन्स्ट्रक्शन फेज नंतर ऑपरेशन फेज मध्ये जे कर्मचारी फायनल करायला पाहिजे होतं ते सगळं राजाराम साहेबांच्या काळामध्ये झालं.

सिव्हिल इंजिनिअरिंगच काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास कोकण रेल्वेचे साडेचारशे इंजिनियर्स होते. शिवाय बाकीचा स्टाफ होता. त्या लोकांना पर्याय दिले होते की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी डिपार्टमेंट मध्ये जाऊ शकता. अन्यथा एवढ्या लोकांच कोकण रेल्वेत भवितव्य नव्हतं. त्यावेळेला कोकणरेल्वे पूर्ण झाल्यावर सुमारे शंभर इंजिनियर सोडून गेले. दुसरीकडे इथल्या अनुभवाचा त्यांना चांगला फायदा झाला. आजही ते दुसरीकडे चांगल्या पोस्टवर कार्यरत आहेत. मी १९९८ साली एच आर डिपार्टमेंट जॉईन केलं ते २०२४ पर्यंत. एचआर डिपार्टमेंट मध्ये माझी सुरुवात झाली ती एच आर इन्स्पेक्टर म्हणून आणि नंतर मी चीफ एच आर इन्स्पेक्टर झालो आणि मग २००९ मध्ये मला ऑफिसर ट्रेडचं प्रमोशन मिळालं.त्याच दरम्यान सहावा वेतन आयोग आला होता आणि त्या सहाव्या वेतन आयोगात रत्नागिरी रीजनचे जवळपास 2000 कामगार त्यावेळी लोकांचे पगार फिक्स करणं किंवा त्या लोकांचं सहाव्या वेतन आयोगात कन्व्हर्ट करण ही सगळी मोठी जबाबदारी माझ्याकडे दिलेली होती. ती मी यशस्वी पार पाडली. त्यानंतर परत परीक्षा देऊन ते रेग्युलर प्रमोशन झालं होतं. नंतर माझं जम्मू-काश्मीर प्रोजेक्ट वरती सगळ्यात पहिला एच आर ऑफिसर म्हणून माझं पोस्टिंग झालं. त्यावेळी तो प्रोजेक्ट चांगल्या गतीमधे यायला लागला होता.काही लोकल लोकांचे प्रश्न होते ते सोडवणे या हेतूने माझं पोस्टिंग तिथे होतं.आधी सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम केल असल्याने सगळ्या साईट्स वर मी भेटी दिल्या, कर्मचाऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि तिथल्या कामाची माहिती मिळवली.तिथे एकूण ५४ किलोमीटर चं कोकण रेल्वेने काम केलंय त्यामध्ये चिनाब नदीवरचा पूल आहे ३५० मिटर उंचीचा तो सगळ्यात वाखाणलेला ब्रिज आहे.दुसरा अंजी म्हणून आहे. सध्या वरळी सिलिंक केबल वायरचा आहे तसा रेल्वेचा केबल ब्रिज कुठे नाहीये पण पहिला अंजी चा ब्रिज आहे.

मला एकूण अकरा बारा पुरस्कार मिळाले त्यातील ३ चेअरमन पुरस्कार मिळाले. सहावा वेतन आयोग आलेला असताना तणावाची काम ठराविक वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असताना केलेल्या अचूक कामा बद्दल मला एक पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर माझी बेलापूरला बदली झाली मधल्या काळात एच आर डिपार्टमेंट मधे आमच्या टीम सोबत चर्चा करून आयटी विभागाच्या मार्फत आम्ही कर्मचारी सर्व्हिस सर्टिफिकेट, जे कोणालाही रेशनकार्ड,लोन,पासपोर्ट किंवा कोणत्याही शासकीय कामात लागतं ते एकदम लहान असतं मात्र त्यात अनेकदा चुका झाल्या की कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा त्याच सॉफ्टवेअर बनवलं. फक्त सर्टिफिकेट कोणत्या कारणासाठी हवं एवढं कॉम्पुटर मधे टाकून प्रिंट घेणे एवढं काम सोपं केलं. आजपर्यंत सुमारे नऊ ते दहा हजार सर्टिफिकेट त्यातून दिली गेली असतील. त्याशिवाय कर्मचारी वार्षिक परफॉर्मन्स

किंवा वार्षिक रिपोर्ट ज्यासाठी खूप वेळ लागायचा. दोन तीन पाने रिपोर्ट लिहायला लागतो. त्याच सॉफ्टवेअर डेव्हलप करून घेतलं. आज बारा तेरा वर्षांचा पाच हजार कर्मचाऱ्यांचा सगळा डाटा तयार आहे, इतक्या रेकॉर्डची प्रिंट घ्यायची गरज नाही. मग लक्षात आलं की रिटायर्मेंट साठी परत अनेक गोष्टी पीएफ, ग्रॅच्युइटी, पेन्शन, कितव्या वर्षी किती मिळणार इ. गोष्टी असतात. त्यात अनेक चुका व्हायच्या आणि त्याचा कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा. त्यासाठी मोड्युल ची गरज लक्षात घेऊन सुमारे आठ महिने काम करून त्यासाठी मोड्युल बनवलं. आज त्यानुसार सुमारे आठशे कर्मचाऱ्यांची निवृत्ती होऊन त्यांचे सेटलमेंट चे काम सुलभ झालं. या कामांसाठी मला सी एम डी पुरस्कार मिळाला. शिवाय आमचे सी एम डी संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेतील पंचवीस वर्ष पूर्ण झालेली निष्कलंक सेवा असा पुरस्कार जाहीर केला होता. तो सुद्धा मला मिळाला. आम्ही जी मोड्युल बनवली ती अनेकठिकाणी वापरली जाऊन आज त्यातून काही रक्कम कोकण रेल्वेला मिळते याचा मला अभिमान आहे. १७ ऑक्टोबर २०२४ ला रिजनल मॅनेजर पदाचा चार्ज घेतला. ऑर्डर ५ सप्टेंबर ला निघाली होती. मात्र कळल्यावर सुरुवातीला पोस्ट बरोबर येणारी जबाबदारी याची चिंता वाटत होती. मात्र कोकण रेल्वेने टाकलेला विश्वास आणि कोणत्याही कामाला, जबाबदारीला नाही म्हणायचं नाही या स्वभावामुळे जबाबदारी स्वीकारली. घर जवळच असल्याने घरी राहून पद स्वीकारा अशी चेअरमन साहेब श्री झा सर यांनी परवानगी दिली.

रोह्या पासून ते सावंतवाडीचं मडूरे स्टेशन ते माझं शेवटचं स्टेशन आहे. हा ३७८ किमी चा ट्रॅक एवढं माझं क्षेत्र आहे. कोकण रेल्वेच्या ७५० किलोमीटर च्या ट्रॅक मधलं सर्वात कठीण सेक्शन म्हणून या एरियाला ओळखलं जातं. इथल्या लोकांचं कोकणरेल्वे वरती खूप प्रेम आहे. कोकणरेल्वे लोकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. प्रत्येकाला वाटत बदल झाला पाहिजे, गाड्यांचे स्टॉप जे आहेत ते वाढवले पाहिजेत. अनेक गाड्या कोकणरेल्वेने वाढवल्या पाहिजेत. अश्या अनेक गोष्टी आहेत. काही वेळा या सगळ्याला तोंड देताना खूप त्रासदायक होतं. लोक जरी सगळे आपलेच असले तरीपण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अनेकदा आमचा नाईलाज असतो. लोकांनी तो समजून घेतला पाहिजे.

आमचा रत्नागिरी क्षेत्रामध्ये २१०० लोकांचा स्टाफ आहे, १६ वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत. माझ्याकडे १६ ब्रांचऑफिसर पण आहेत. त्या सगळ्यांचं डेली रिपोर्टींग असत. सकाळी ६.३० ला सुरु होणारा दिवस अनेकदा रात्रीपर्यंत सुरु असतो.

ट्रॅक इन्स्पेक्शन आहे किंवा काही कटिंग ची काम चालू आहेत, सुविधांची कामे सुरू आहेत तिथे जाण होतं.त्याच बरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीनही जिल्हे माझ्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे तिथल्या शासकीय ऑफिस ना भेट देण किंवा मिटिंग अटेंड करण गरजेचं असत. स्थानिकाच्या प्रश्नांना उत्तर देताना खूप सांभाळून बोलावं लागत. अभ्यास करावा लागतो.

नोकरीच्या सुरवातीच्या काळात कामानिमित्त मला खूप बाहेर राहावं लागायचं. त्यामुळे घरी तेवढं लक्ष देता यायच नाही त्यामुळे आईवडिलांचा पाठिंबा आणि बायकोची खंबीर साथ यामुळे मी हे सगळं करू शकलो.

कोंकण रेल्वेची रोरो सिस्टीम ही २००२ पासून सुरु झाली आणि ती अजून चालू असल्याच त्यांनी सांगितलं. सध्या दरड कोसळण रेल्वे बंद असणं असे प्रकार कमी झालेत. कारण सुरवातीच्या काळात आजूबाजूला हलके कटिंग वाढवण, स्टेप देणं अशी बरीच सारी काम कोकणरेल्वेने केली. त्यामुळे आता तो प्रकार कमी झाला आहे. आधीची आणि आत्ताची कोकणरेल्वे यात फरक म्हणायचं किंवा बदल हवा असं म्हणायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी सुधारणा करण्यासाठी स्कोप हा कायम असतो. आता आमची रेल्वे स्टेशनं जुनी झाली आहेत. साधारण २८ वर्ष झालीत आता त्याच्या रिडेव्हलपमेन्ट ची कामे चालू आहेत. तसेच ट्रॅक च्या रिनोव्हेशन चं चालू आहे. ट्रॅक पण जवळ पास तेवढी वर्ष त्यांनी काम केल आहे.

साधारण २०-२२ वर्ष रुळांचं आयुष्य असत. तस स्लीपरच ही असत. कारण त्या काँक्रेट स्लीपर्स आहेत. आता काही ठिकाणी ते तुटणं अश्या गोष्टी चालू आहेत. कारण कोकणरेल्वे ची जी क्षमता आहे त्याच्या १३५% आम्ही गाड्या चालवतो. त्यामुळे ते सगळं गरजेचं आहे.रोहा ते वीर पर्यंत कोकणरेल्वे चं दुपदरीकरण झालं आहे पुढील काम मंत्रालयात मंजुरी साठी गेलेल आहे. लवकरच ते ही होईल आणि आत्ता जो कोकणरेल्वे वर ताण पडतोय. तो थोडा कमी होईल. याशिवाय त्यांनी अनेक घटना, अनुभव, किस्से सांगितले. माहिती दिली.

रत्नागिरीतील आपला माणूस कोकण रेल्वेच्या स्थापने पासून ते आता रिजनल मॅनेजर आहेत. याचा सगळ्यांना अभिमान आहे. त्यांना पुढील प्रमोशनसाठी शुभेच्छा दिल्या. राजाभाऊ जोग यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून कार्यक्रम संपला.आता पुन्हा भेटू पुढील महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी एका वेगळ्या व्यक्तीसोबत!

*अविनाश काळे, ९४२२३७२२१२*

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page