चिपळूणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री उदय सामंत..

Spread the love

जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणच्या शिष्टमंडळाशी संवाद; विकास, पूरस्थिती, एमआयडीसी आणि पर्यटनावर सकारात्मक भूमिका

*चिपळूण :* चिपळूण शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी ही भूमिका मांडली.

संस्थेचे अध्यक्ष सुनील साळवी, उपाध्यक्ष गजेंद्र खडपे, सचिव दीपक शिंदे, खजिनदार संतोष पिलके तसेच सदस्य ओंकार रेळेकर, ललेश कदम आदींनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांसह चिपळूणच्या विकासासंदर्भातील मुद्दे मांडले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.

चिपळूणमध्ये यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यातून अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी देण्यात आला असून शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी नुकताच सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.

वाशिष्ठी आणि जगबुडी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आल्यामुळे यंदा पुराची तीव्रता कमी झाली असल्याचे सांगत, पूरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, पाण्याअभावी किंवा अन्य कारणांमुळे एमआयडीसीतील एकही उद्योग किंवा कारखाना बंद पडू दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका उद्योगमंत्री म्हणून त्यांनी व्यक्त केली. नवीन उद्योग जिल्ह्यात आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईप्रमाणेच समुद्रातील खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रूपांतर करणारा प्रकल्प भविष्यात रत्नागिरीत उभारण्याचा मानस असल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली. या दृष्टीने शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिपळूण नगर पालिकेला अधिक निधी, एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था, वाशिष्ठी-जगबुडी नदीसंदर्भातील उपाययोजना, पूरनियंत्रण आणि पर्यटन विकासासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page