
रत्नागिरी:- भारतासाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ असणारा दहशतवादी आणि फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्तांना अखेर खरेदीदार मिळाला आहे. राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दाऊदच्या वडिलोपार्जित शेतजमिनींचा लिलाव यशस्वी झाला असून, मुंबईतील एका व्यक्तीने या सर्व भूखंडांची खरेदी केली आहे.
५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत, मुंबईच्या एका गुंतवणूकदाराने सर्वाधिक बोली लावून चारही भूखंड आपल्या नावे केले. या जमिनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावात आहेत. हे गाव दाऊद इब्राहिमचे मूळ गाव मानले जाते. विशेष म्हणजे, यातील अनेक जमिनींची नोंद पूर्वी त्याची आई अमिना बी यांच्या नावे होती. केंद्र सरकारने ‘साफेमा’ (स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर्स अॅक्ट) अंतर्गत या मालमत्ता जप्त करून त्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती.
या लिलावात चारही भूखंड एकाच खरेदीदाराने विकत घेतले आहेत. यामध्ये ‘सर्वे क्रमांक ४४२’ हा सर्वात मोठा भूखंड १० लाख रुपयांहून अधिक किमतीला विकला गेला, तर उर्वरित तीन भूखंडांची विक्रीही वेगवेगळ्या किमतीत झाली. लिलावाच्या नियमांनुसार, खरेदीदाराला एप्रिल २०२६ च्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण रक्कम जमा करावी लागणार आहे, त्यानंतरच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण मानली जाईल.
दाऊदच्या या जमिनी विकण्याचा प्रयत्न सरकार गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. यापूर्वी २०१७, २०२०, २०२४ आणि २०२५ मध्येही लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दाऊदच्या नावाशी संबंधित असल्याने भीतीपोटी अनेकदा खरेदीदारांनी पाठ फिरवली होती किंवा बोलीची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती.
यापूर्वी दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांनीही दाऊदच्या काही मालमत्ता खरेदी केल्यामुळे चर्चेत आले होते. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक कारणांमुळे किंवा कायदेशीर वादांमुळे व्यवहार पूर्ण होऊ शकले नव्हते.
दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असून या घटनेत २५० हून अधिक निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. भारतीय तपास यंत्रणांच्या मते तो सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*