
दीपक भोसले/संगमेश्वर/दि २३ जून- गोळवली, धामणी पंचक्रोशीतील गोळवली, धामणी यांच्यासह 12 गावांतील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यामुळे चिंतेत असून, सध्याच्या पावसाळी हंगामात भात लावणीचे काम रखडले आहे. युरियासाठी सुमारे 30 टनांची मागणी असूनही, अद्याप खताचा पुरवठा झालेला नाही. परिणामी शेतकरी खताच्या प्रतिक्षेत आहेत.
याबाबत बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर तातडीने खताचा पुरवठा झाला नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग पत्करू. प्रशासनाने उद्याच याबाबत भूमिका स्पष्ट करावी.”
शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण असून, उद्या स्थानिक प्रशासनाकडे याबाबत जाब विचारण्यात येणार आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास याचा थेट परिणाम भात लावणीवर होणार असून, उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
“शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे, खत मिळाले नाही तर शेती कशी करायची?” – असा थेट सवाल शेतकरी विचारत आहेत. स्थानिक शेतकरी संघटनांनी देखील या मुद्द्यावर आवाज उठवण्याची तयारी सुरू केली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.