
रत्नागिरी दि २२ जून- पहेलगाम येथे झालेला अतिशय भ्याड असा दहशतवादी हल्ला.. त्यानंतर भारतीय सैन्याने त्यास दिलेले चोख प्रत्युत्तर.. दरम्यान निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती.. आणि त्यानंतर जनमानसावर आकस्मिकपणे पसरलेली विचित्र शांतता…. अशा सर्व तणावग्रस्त गोष्टींबाबत गेले दोन महिने विविध ठिकाणी, विविध प्रकारे, अनेक अर्थाने होणाऱ्या चर्चा ऐकिवात येत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने कानावर येणाऱ्या गोष्टींमुळे सामान्य नागरिक मात्र या विषयात अनभिज्ञ तरी जाणवतो किंवा अनुचित प्रतिक्रियांमध्ये गुरफटलेला दिसून येतो..! आजही प्राप्त परिस्थितीत, सामान्य नागरिक म्हणून या घटनेकडे कसे पहावे आणि त्यातून काय अर्थ घ्यावा, याबाबत विचलितता दिसते. यावर सर्वसामान्यजनांना उपाय आणि दिलासा लाभावा या हेतूने ‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे ‘श्रवणानंद’ या उपक्रमांतर्गत माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक, प्रमुख श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. धर्माधिकारी हे वक्ता दशसहस्त्रेषु म्हणून ख्यातकीर्त आहेतच ! पण त्यांचे विशेष वेगळेपण हे आहे की, त्यांच्या वक्तृत्वातील नेमकेपणा, मुद्देसूदता, आणि संयमित विश्लेषण यातून घटनेच्या पार्श्वभूमीवरील राजकीय, लष्करी आणि नागरी सुरक्षितता… अशा दृष्टीकोनातून विषयाचा सखोल अभ्यास श्रोतृवर्गासमोर मांडला जात असतो. सामान्य नागरिक म्हणून *ऑपरेशन सिंदूर’* या घटनेतून मनात निर्माण झालेल्या उत्सुकतेला जर योग्य माहितीचा, अभ्यासाचा आणि यथोचित विचारांचा आधार मिळाला तर आपण अधिक जागरूकतेने वावरु, विचार करू शकणार आहोत…! त्यामुळे याच उद्देशाने श्रीमान धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचा विषय चतुरंगने जाणीवपूर्वक *‘ऑपरेशन सिंदूर : पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व’* अशा आशयाचा सुनिश्चित केलेला आहे.
रत्नागिरी (जिल्हा) नगरवाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत आयोजित होणारे व्याख्यान सोमवार दि. २३ जून रोजी सायंकाळी ०६.१५ वाजता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह’ येथे,* तर चिपळूण येथे होणारा व्याख्यान कार्यक्रम *दि.२४ जून रोजी सायंकाळी ०६.१५ वाजता ‘इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र-चिपळूण’* येथे सुनिश्चित करण्यात आला आहे.
दिनांक २१ जून ते २४ जून या चार दिवसात चतुरंग प्रतिष्ठान आयोजित गोवा, रत्नागिरी, चिपळूण येथे नागरिकांसाठी ४ व्याख्याने आणि विद्यार्थ्यांसाठी २ स्वतंत्र व्याख्याने याकरिता व्याख्याते म्हणून लाभलेले वक्ते श्री.अविनाश धर्माधिकारी हे प्रशासकीय व्यवस्थापनात लक्षवेधी काम केलेले एक यशस्वी माजी अधिकारी आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा प्रभावी वक्ता म्हणून प्रख्यात आहेत.
अशा व्यक्तीचा व्याख्यान योग आणि ज्वलंत राष्ट्रीय विषय… अशी दुर्मिळ उपलब्धी साधण्यासाठी समस्त उत्सुक-सजग-सुजाण नागरिकांनी आपल्या नातेवाईक, कुटुंबिय, मित्रमंडळीसह आपापल्या सोयीच्या ठिकाणी या व्याख्यानासाठी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे. प्रत्येक ठिकाणी कृपया कार्यक्रमापूर्वी १५ मिनिटे आधी येऊन श्रोत्यांनी आसनस्थ व्हावे अशी चतुरंगची सुजाण नागरिकांसाठी विशेष विनंती आहे.
या शिवाय,
(खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील करिअर’ संदर्भाने, याच विषयातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्ती असलेल्या अविनाश धर्माधिकारी यांचा आणखी एक विशेष कार्यक्रम फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी चतुरंगने योजिला आहे. चतुरंग प्रतिष्ठान आणि डी.बी.जे. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योजिलेल्या या कार्यक्रमात ‘प्रशासकीय अधिकारी सेवा.. संधी.. की सोय..?’ या विशेष मुद्याच्या अनुषंगाने एका खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. चतुरंग निवासी वर्गाचे माजी विद्यार्थी आणि युपीएससी परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारलेले साडवली-देवरूख येथील सुरज शिंदे हे अविनाश धर्माधिकारींशी संवाद साधणार आहेत. हा मुलाखत कार्यक्रम डी.बी.जे. महाविद्यालयमधील सेमिनार हॉल येथे २४ जून रोजी सकाळी ११.३० वाजता फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच आयोजित केलेला आहे).