
मुंबई- महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. परंतु जूनच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला. त्यानंतर राज्यात पाऊस सक्रीय झाला. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात २५ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे.
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. पुण्यासह परिसरात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. रविवारी मुंबईतील आकाशात काळे ढग दाटून आलेत. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेज अलर्ट दिला आहे. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी रत्नागिरीमध्ये दिवसभर पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५६२ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.