मुंडे महाविद्यालयाचा 29 वा ‘वर्धापन दिन’ व ‘विद्यार्थी सत्कार’ समारंभ उत्साहात संपन्न….

Spread the love

महाविद्यालयाच्यचा 29 व्या वर्धापनदिनानिमित्ताने  मार्गदर्शन  करताना   संस्थाध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते. सोबत इतर मान्यवर 

मंडणगड-(प्रतिनिधी): येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व पद्मश्री कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा 29 वा वर्धापन दिन संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, सहकोषाध्यक्ष सुनिलभाई मेहता, संचालक आदेश मर्चंडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.  वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रभारी प्राचार्य डॉ.  वाल्मिक परहर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्था व महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. संस्था मोठी करण्यामध्ये पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मंडणगड व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मा. दादांनी अथक परिश्रमातून व संघर्षातून या महाविद्यालयाची 1996 साली उभारणी करून उच्च शिक्षणाची सोय केली. संस्था पदाधिका-यांपासून ते शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक या सर्वांचे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासातील सहकार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी पद्मश्री कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता बारावी वाणिज्य वर्गात कु. मेघना यादव, कु. सिद्धी दिवेकर व कु. अनिशा  कदम या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले, तर बारावी विज्ञान वर्गात कु. नेहा बामणे, कु, श्रद्धा मोडकले, रोहन नलावडे या विद्याथ्र्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले. तृतीय वर्ष कला वर्गात अविनाश मांडवकर, कु सलोनी पाटील व हेमंत शिगवण या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले. तृतीय वर्ष वाणिज्य वर्गात कु, अर्पिता भोसले, कु. क्रांति पाडावे व कु. मुस्कान खलफे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले. तृतीय वर्ष विज्ञान वर्गात कु, रोजमीन मुंग्रुसकर, कु. रिद्धी येरूणकर व प्रणव केंद्रे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले.

यावेळी महाविद्यालयात कार्यरत शिक्षक व कर्मचारी यांच्या यशस्वी पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये तन्मय कंठाळे -10 वी उत्तीर्ण, ध्रुव पवार – 10 वी उत्तीर्ण, कु. आर्या सकपाळ -10 वी उत्तीर्ण, पार्थ सकपाळ – 12 वी उत्तीर्ण, देवश्री कुलकर्णी -12 वी उत्तीर्ण व किरण परहर -सेट व गेट उत्तीर्ण यांना गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु. क्रांति पाडावे हिने आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी सांगितले की, संस्था व महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये सुरूवातीच्या काळात मंडणगड व परिसरातील अनेकांनी महत्वाचे योगदान दिले. या महाविद्यालयामुळे ख-या अर्थाने मंडणगडचा कायापालट झाला. येथून पदवी संपादन करून बाहेर पडलेले कित्येक विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रांत उत्तम काम करीत आहेत, हे पाहून समाधान वाटते. सलग चार वेळा महाविद्यालयाने यशस्वीपणे करून घेतलेले नॅक मूल्यांकन, एकाच वर्षी संस्था व महाविद्यालयातील चैघांना मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळावर प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी, महाविद्यालयास प्राप्त झालेले आय. एस. ओ. मानांकन तसेच ग्रामीण भागातील सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून मुंबई विद्यापीठाकडून झालेला गौरव आदि महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या वाटचालीतील उल्लेखनीय बाबी आहेत. पुढच्या टप्प्यात महाविद्यालयाची सर्वागीण उन्नती करण्यासाठी सर्व घटकांनी महाविद्यालयाप्रती कृतज्ञता बुद्धी ठेवून सिंहावलोकन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थाध्यक्षा सौ.संपदाताई पारकर यांनी सांगितले, की ज्या तालुक्याकडे काळया पाण्याची शिक्षा म्हणून पाहिले जायचे, तो मंडणगड तालुका आज या महाविद्यालयाच्या रूपाने विकसित होत आहे. सर्वांच्या दृष्टिने ही आनंदाची बाब आहे. वास्तविक या महाविद्यालयामुळे मंडणगडचे परिवर्तन घडले, याचा विसर पडता कामा नये. महाविद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम टिकवून ठेवली आहे. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा यांनी अतिशय कष्टातून हे महाविद्यालय सुरू केले. ते आज तिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण सर्वांनी मिळून या महाविद्यालयाची प्रगती करण्याची  आवश्यकता  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  यशस्वी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी केले तर शेवटी आभार उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी मानले.

       

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page