
नाणीज- विद्यार्थ्यांनी अध्ययन व स्वप्रगतीसाठी संकल्प करून त्याला संस्काराची जोड देणे गरजेचे आहे, असे अमृतमय मार्गदर्शन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना केले.
श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूट या प्रशालेच्या वतीने
शारीरिक ,मानसिक ,अध्यात्मिक तसेच बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज व गुरुमाता सौ. सुप्रियाताई यांच्या हस्ते करण्यात आले.
पुष्पमाला अर्पण करून उभयतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे चेअरमन अर्जुन फुले, परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण प्रशालेचे श्री लघाटे, गुरुकुल विभाग प्रमुख श्री मोने व सौ. मोने, संस्थानचे मुख्य विश्वस्त शांताराम दरडी,मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर,कुंडलिकराव वायभासे व अन्य संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्याध्यापिका डॉ. सौ अबोली पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्षारंभ उपासना कार्यक्रमाला प्रारंभ केला. या कार्यक्रमानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना आपल्या अमृतमय वाणीतून उद्बोधन केले. ते म्हणाले, “संकल्प ही भावना आपल्या मनामध्ये रुजण्यासाठी उदार अंत:करणाची व उदात्त भावनेची नितांत गरज असते. आम्ही अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका, इंग्रजी माध्यमाची शाळा, वेद पाठशाळा असे विविध संकल्प केले होते व ते आज सत्यात उतरलेले आहेत. हाच वारसा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या अध्ययनामध्ये व स्वप्रगतीसाठी संकल्प करावेत व त्याला संस्काराची जोड द्यावी.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांत सकारात्मक ऊर्जा, मनाचे पावित्र्य, आचारामध्ये शुद्धता निर्माण व्हावी यासाठी अग्निहोत्राचा उपक्रम प्रशालेमध्ये सुरू करण्यात आला आहे. आज ही आज काळाची गरज आहे.विद्यार्थ्यांवर प्रशालेत केले जाणारे संस्कार हे दृढ होतात.”
त्यानंतर प्रशालेचे चेअरमन अर्जुन फुले यांनीही शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ त्रिशा सुवारे व सौ संस्कृती ठोंबरे यांनी केले. आभार सौ. वृषाली भोगटे यांनी मानले.