कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा; रत्नागिरीला रेड अ‍ॅलर्ट, मुंबई-ठाणेसह राज्यात कसं असेल हवामान?…

Spread the love

गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अ‍ॅलर्ट’ देण्यात आला होता. तर शुक्रवारी रत्नागिरीला आणि शनिवारी रायगडला ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच शनिवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ देण्यात आला आहे….

मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर १५ दिवसांहून अधिक काळ पावसाचे फारसे अस्तित्व राज्यात जाणवले नव्हते. मात्र आता मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून राज्यातही पावसाचे प्रमाण वाढू शकते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अ‍ॅलर्ट देण्यात आला होता. तर शुक्रवारी रत्नागिरीला आणि शनिवारी रायगडला रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच शनिवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मान्सून गुरुवारपासून पुढल ४८ तासांमध्ये विदर्भाच्या काही भागांमध्येही पोहोचण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापासून ओडिशापर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगड, मराठवाडा, कर्नाटकचा अंतर्गत भाग येथून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत चक्रीय वातस्थितीच्या वरच्या भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पंजाब ते आग्नेय मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानच्या आग्नेय भागापासून मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय वातस्थिती आहे. याच्या एकत्रित परिणामामुळे राज्यात १७ जूनपर्यंत पाऊस सक्रिय आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी १५ जूनपर्यंत अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकतो. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जना, विजा, जोरदार वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

शुक्रवारी आणि शनिवारी रत्नागिरीला ‘रेड अ‍ॅलर्ट’ देण्यात आला आहे. तर त्यानंतरचे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. रायगडसाठी शुक्रवारी ‘ऑरेंज’ तर शनिवारी ‘रेड अ‍ॅलर्ट’ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ तर रविवारी ‘रेड अ‍ॅलर्ट’ देण्यात आला आहे. दक्षिण कोकणासोबतच उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला शनिवारी ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. शुक्रवारसाठी कोल्हापूर, कोल्हापूरचा घाट परिसर, सातारा, साताऱ्याचा घाट परिसर, सांगली येथेही पावसाचा जोर वाढू शकतो. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे तर मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page