
मुंबई- आज मुंबईत रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 प्रवाशांचे प्राण गेले आहेत. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने निघालेल्या या लोकलचा अपघात झाला. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की, शहरं म्हणून याकडे बघायला कोणी तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हणून जेवढी चर्चा सुरू आहे आणि जेवढ्या बातम्या लावल्या जात आहेत, तेवढ्या आता तुम्ही या अपघाताच्या लावणार का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तर, मुंबईत नीट रस्ते नाहीत, पार्कींग व्यवस्था नाही. केवळ रेल्वेपुरता हा विषय नसून शहरांचा विचका झाला आहे, अशा शब्दात राज यांनी रेल्वे अपघातावर आपले मत मांडले. मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
मी रेल्वेने प्रवास केला आहे, त्यामुळे मला प्रवास माहीत आहे. कारण, त्यावेळी गर्दी कमी असायची. आता, मुंबईत संध्याकाळी मेट्रोत शिरून दाखवा, आज ज्या कर्व्हवर अपघात झालाय तो काय नवा नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी, असेही राज यांनी म्हटले. तर, रेल्वेनं लोकलचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यावरही वास्तववादी प्रतिक्रिया दिली. लोकलचे डोर क्लोज केले तर लोकं गुदमरून मरतील, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुंबईतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनावर परखडपणे भाष्य केले.