
प्रशासनाकडून फक्त दगड लावून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अपघाताचा धोका निर्माण झालाय.
चिपळूण /रत्नागिरी /प्रतिनिधी- राज्यभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून कोकणपट्ट्यात पावसाने जीवनमान विस्कळीत झाले आहे. चिपळूण–कराड मार्गावरील (Chiplun Karad Road) कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटेच संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. खोल दरीच्या काठावर असलेली भिंत कोसळून रेलिंग सुद्धा निखळलेली दिसते. हजारो अवजड वाहनं दररोज या मार्गावरून जातात; मात्र प्रशासनाकडून फक्त दगड लावून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अपघाताचा धोका निर्माण झालाय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झालीय.
कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली…
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात अचानक संरक्षक भिंत कोसळली असून रेलिंगही निखळलीय.घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळली. यामुळे त्या ठिकाणी रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर या भागातील लोखंडी रेलिंगही तुटलं असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
घटनास्थळी प्रशासनाकडून सध्या फक्त दगड लावून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजना अपुऱ्या असून कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाटपरिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्यानं अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. अतिरिक्त पडझड होण्याची शक्यता अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर तातडीने कायमस्वरूपी बांधकाम आणि लोखंडी रेलिंग बसविण्याची आवश्यकता आहे.
प्रशासनाकडून घटनेकडे दुर्लक्ष ?..
या मार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी आणि मालवाहतूक वाहने जातात. घाटातील वाहतूक बंद झाल्यास वाहतूकीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पावसाने आणि वादळी वाऱ्यांमुळे घाटरस्त्यावर दरड कोसळणे,झाडांच्या पडझडीसह अनेक घटना घडताहेत. वाहतूकीचा खोळंबा होत असल्याने वाहतूक कोंडीही वाढताना दिसतेय. दरम्यान, चिपळून कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळल्यानंतरही प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी यंत्रसामग्री पाठवली नसल्याने स्थानिकांनी उच्च आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याचे मागणी केले आहे.
7 ते 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 7 ते 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांचे 10 जून पर्यंत शेत नाही तयार झाले तर 10, 11 आणि 12 जून तीन दिवस शेत तयार करायला पुन्हा चान्स मिळेल. राज्यात 13 ते 18 जून मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी ओढे, नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे.