
जे डी पराडकर/संगमेश्वर- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथम त्यांना वाचनाची आवड लावणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे विद्यार्थी अधिक चौकस – जिज्ञासू बनतात, असे प्रतिपादन स. रा. देसाई अध्यापक विदयालयाचे अध्यापकाचार्य सुनील जोपळे यांनी केले.
माध्यमिक, उच्च माध्यमिक, कला आणि क्रीडा शिक्षकांसाठी फाटक हायस्कुल रत्नागिरी येथे डाएट तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणामध्ये ‘ भाषेची ठळक वैशिष्ट्य ’ या विषयावर जोपळे हे बोलत होते.
जोपळे यांनी आपल्या पाठाची सुरुवात विचारप्रवर्तक प्रश्नाने केली. मधमाशी नसती तर, या प्रश्नावर अनेक शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. शिक्षणामध्ये भाषा का महत्वाची आहे , हे सांगताना जोपले यांनी विविध अभ्यासपूर्ण उदाहरणं दिली. संपूर्ण पाठ हा चर्चात्मक पद्धतीने संपन्न झाल्यामुळे तो अधिक प्रभावी झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भाषा विषयांचे ज्ञान देताना मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व पटवून द्यावे. प्रभावी संवाद कसा साधता येतो, हे सांगताना जोपळे यांनी विद्यार्थ्यांना संस्कृतीचे ज्ञान दिल्यास शिक्षण अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरेल असे जोपळे यांनी अखेरीस नमूद केले.