

रत्नागिरी, ४ जून (वार्ताहर): संगमेश्वरात वाळूमाफियांनी मंडल अधिकाऱ्यांसह ग्राम महसूल अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देवून त्यांना कारवाई ठिकाणी अडकवून ठेवण्यासाठी फोर व्हिलर आडवी लावून रस्ता अडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द संगमेश्वर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सागरकुमार अनंत करंबेळे हे मंडल अधिकारी म्हणून माखजन येथे सेवा बजावत आहेत. मंडल अधिकाऱ्यांकडे अवैध वाळू उपशाची तक्रार आली. त्याची खात्री करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अवैध वाळू उपसा करण्याकरीता एक सक्शन पंप बसवला असल्याचे निदर्शनास आले. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने या अवैध वाळू उपसा करणाऱ्या पंपावर कारवाई करत असताना त्याठिकाणी संदेश सुर्वे हे आले व त्यांनी या ठिकाणी शासकीय कारवाई करू नये, असे सांगत ग्राम महसूल अधिकारी व जेसीबी ऑपरेटर यांना देखील शिवीगाळ करून धमकी दिली.

दोघा महसूल कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी…
खाडकिनाऱ्यावरून अधिकारी बाहेर पडू नयेत यासाठी त्यांच्या बाहेर पडण्याच्या रस्त्यावर चारचाकी गाडी आडवी लावून त्यांचा रस्तादेखील अडवला होता. याप्रकरणी सागरकुमार अनंत करंबेळे यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी संदेश सुर्वे, केदार उर्फ मुन्ना देसाई, तेजस निकम यांच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १३२, १२६(२), ३५१ (२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.

गेली अनेक दिवस वाळूचा उपसा चालू असताना तहसीलदारांचे दुर्लक्ष
आज महसूल अधिकाऱ्यांवर धमक्या देण्याचे वेळ येईपर्यंत प्रशासन गप्प का बसले हा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर विषयांमध्ये तहसीलदार यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल असून त्याच्यावर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसापूर्वी एका हॉटेलमध्ये आणि कर्म विभागाच्या अधिकारी व वाळू माफिया यांच्या चर्चा झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. या विषयाचेही लेखी तक्रार देणार असलेल्यांची चर्चा आहे. सदर विषयांमध्ये वाळूमाफियाने गेली पाच ते सहा वर्ष शास्त्री नदी मधील करजुवे पंचक्रोशी आणि माखजन पंचक्रोशी मध्ये अवैद्य वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे. महसूल अधिकारी आणि काही राजकारण्यांचे हितसंबंध असलेले लोक पाठीशी असल्यामुळे सदरचा वाळू यांचा धंदा जोरात चालू आहे. करोडो रुपयांची उलाढाल दिवसाला होते. परंतु महसूल शासनाला मिळत नाही त्यामुळे सदरचा धंदा अधिकृत करून शासनाकडे महसूल जमा करून घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सदर विषयाचे सखोल चौकशी करून वाळू माफियांवर कारवाई महसूल मंत्री कारवाई करणार का ?
गेली अनेक दिवस माखजन पंचक्रोशीतील पुढारी अधिकाऱ्यांच्या हप्ते पोचवत असल्याची बातमी आहे. सदर विषयाची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते महसूलमंत्राकडे करणार असून अंदाजे 20 जणांची नावे सहित वाळू माफी यांची यादी महसूल मंत्र्यांकडे देणार असून सदर विषयाची सखोल चौकशी करावी. त्यांचे कॉल डिटेल चेक करावे. व सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी करण्यात आलेली आहे. सदर विषयाची चौकशी करण्याची मागणी त्या अगोदरच सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेले आहेत परंतु सदर विषयावर कारवाई होत नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. त्यांच्याकडेच कारवाईसाठी अर्ज पाठवण्यात येतात असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कांदळवन अधिकाऱ्यांकडे ही तक्रारी देण्यात आल्या असून त्यांनीही सदर विषयांमध्ये गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रश्न उपस्थित होत आहे की पालकमंत्री सदर विषयांमध्ये लक्ष घालून वाळू माफियांवर कारवाई करणार का? असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे.