
शिवराज्याभिषेकानिमित्त पंच परिवर्तनाच्या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे दिले जातील, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि पराक्रम विद्यार्थ्यांपर्यन्त पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, तसंच देशासाठी समर्पणाची भावना रुजावी यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली. मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
कोणत्या विषयावर व्याख्यान? –
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील १०९७ आयटीआय मध्ये पंचपरिवर्तन या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे येत्या सहा जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. या व्याख्यानमालेत खालील विषयावर व्याखाने होणार आहेत.
१) नागरिक कर्तव्ये आणि शिष्टाचार
२) कुटुंबं प्रबोधन
३) स्वदेशी विचार व प्रबोधन
४) समाजिक समरसता
५) पर्यावरण संरक्षण
आयटीआयमध्ये अत्याधुनिक ६ विषयांचे नवे अभ्यासक्रम –
येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमध्ये अत्याधुनिक सहा विषयांचे नवे अभ्यासक्रमही सुरू करणार असल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली. या अभ्यासक्रमामुळे आणि हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी शिकल्यामुळे निश्चिताच त्यांना याचा फायदा होईल आणि आगामी काळात त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिला. सार्वजनिक अर्थात पीपीपी धोरणाला उद्योगक्षेत्राचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, म्हणून हे अभ्यासक्रम आणले आहेत. पाहूया आयटीआयमध्ये अत्याधुनिक सहा विषयांचे नवे अभ्यासक्रम कोणते असणार
– सौर ऊर्जा तंत्रज्ञ
– इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ
– ड्रोन तंत्रज्ञ
– आर्टिफिशिअल इंटिलिजन्स
– इंडस्ट्रियल रोबोटिक्स
या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातल्या आयटीआयमध्ये सुमारे १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती यावेळी मंत्री लोढा यांनी दिली.