
रत्नागिरी- चांगले काम करणाऱ्या पत्रकाराला दिल्लीत नेहमीच सन्मान आहे. बातमीदारीसाठी पातळी घसरवणार असू , तर पत्रकाराला आणि पत्रकारितेला कधी सन्मान मिळणार नाही, असे मत अभिजीत ब्रह्मनाथकर यांनी मांडले.
विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कोकण विभागातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेत ‘दिल्लीतील पत्रकारिता’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल उपस्थित होते. श्री. ब्रह्मनाथकर यांनी त्यांच्या दिल्ली वास्तव्यातील पत्रकारितेतील अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, संसदीय पत्रकारितेत सर्वात पहिले पाऊल टाकण्याची संधी मला दिल्लीत मिळाली. घडामोडीच्या वातावरणातील कुठलीही व्यक्ती बातमी देईल, हा मंत्र दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील पत्रकार मित्रांने दिला. दिल्लीने अनेक पत्रकार पाहिले. दिल्लीतून बातमी आली की, सर्वत्र ती चर्चिली जाते. पत्रकाराला स्टारडम मिळत नाही.
बऱ्याच वेळा पत्रकारांकडून कधीकधी नेता बातमी मिळवतो आणि राजकारण करतो हे सांगून, तीन नाराज खासदारांची बातमी पत्रकारांकडून मिळवून त्यांना सतेत आणल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला. कधीकधी राजकीय लोक बातमी पेरायचे. तर, कोणी दोन ओळी बोलायचे त्याची बातमी होवून जायची. मी वर्तमानात रहायला शिकलो. सध्याच्या यू ट्यूब, व्हॉटस ॲप च्या माध्यमातून पत्रकारिता सुरु झाली आहे. येणाऱ्या काळात काल्पनिक पत्रकार, काल्पनिक निवेदकाने बातमी दिल्यास नवल वाटायला नको, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या मार्गदर्शनाचा समारोप झाला. प्र. उपसंचालक अर्चना शंभरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक संचालक संजिवनी जाधव यांनी सूत्रसंचलन केले.