
*पुणे-* शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र आले आहे. पुण्यातील साखर संकुलातील AI च्या वापराबाबत बैठकीच्या निमित्ताने शेजारीच बसल्याचे दिसून आले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत या संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तर गेल्या 15 दिवसांत ही तिसरी भेट असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान रयत संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार हे अध्यक्ष तर मी ट्रस्टी म्हणून बैठकीला उपस्थित होतो. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तिथे मी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकीला उपस्थित नव्हतो, रयत संस्थेमध्ये जी बैठक झाली ती AI च्या संदर्भात झाली असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे पूत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातही अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसून आले होते. तर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीलाही ते एकत्र आले होते. राजकारणात सुरू असलेल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चेनंतर आता पवार कुटुंबियांची वाढती जवळील ही देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
*अजित पवार नेमके काय म्हणाले?..*
अजित पवार म्हणाले की, शरद पवार आणि माझ्यात भेटी झाल्या यात कुटुंबातील एक कार्यक्रम होता. परिवार म्हणून आपण एकत्र येतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही वर्षांनुवर्षे चालत आली आहे, त्यावर बाहेरच्या व्यक्तीने काही बोलू नये. हा पवार कुटुंबियांचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यात मी ट्रस्टी आहे. मी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. तिथे सर्वपक्षीय नेते संस्थेचे सदस्य म्हणून बैठकीला येत असतात.
अजित पवार म्हणाले की, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर मान्यवरांना बोलावतात, आणि चर्चा करतात. मुख्यमंत्री विरोधकांना बोलावून चर्चा करतात. काही विषय असे असतात की त्यामध्ये राजकारण आणायचे नसते, राजकारणाच्या पलीकडचे असतात. सर्वच गोष्टीमध्ये राजकारण आणायचे नाही. आता केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आम्ही जनतेला बांधील आहोत. त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेकांचे अनुभवाचे बोल असतात त्यांच्याकडून माहितीची देवाण- घेवाण करणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला हे शिकवले आहे त्यातून मी तरी या बैठकीला हजर राहिलो आहे.
*राऊतांचे सूचक वक्तव्य…*
संजय राऊत म्हणाले की, रोहित पवारांनी जे ट्विट केले आहे त्यात काय वेगळे आहे. अजित पवार- शरद पवार हे एकत्र आलेले आहेत. त्यांच्याकडे रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठाण, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या संस्था आहेत, तिथे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारखे नेते एकत्र येतात आणि बंद दाराआड चर्चा होते. आमचे तसे नाही, आमच्याकडे अशा संस्था नाही, आमचे जे काही आहे ते स्पष्ट आहे, संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार-अजित पवार भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
*रोहित पवारांचे सूचक ट्विट…*
रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे.