
संगमेश्वर : घरामध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या तालुक्यातील कसबा येथील विद्यार्थिनीने शनिवारी सकाळच्या सुमारास आत्महत्या केली. मृण्मयी गजेंद्र देशमुख (13) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती जवळच्या शाळेमध्ये शिकत होती. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृण्मयी देशमुख हिचा 22 रोजी सकाळी 7 वाजता किरकोळ कारणातून आईसोबत वाद झाला होता. याचा मनामध्ये राग घेऊन आई घरामध्ये काम करत असतानाच तिने घराचा दरवाजा बंद करून घेतला आणि पडवीतील वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ मुलगी बाहेर न आल्याने आईने सकाळी 10 च्या दरम्यान तिला हाक मारली, मात्र हाकेला प्रतिसाद न मिळाल्याने आईने दरवाजा तोडला. यानंतर आतमध्ये प्रवेश केला असता मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत.