लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात लोकसभा आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा निवडणूक आयोगाकडं अक्षरशः पाऊस पडतोय.आतापर्यंत आयोगाकडं आलेल्या सुमारे दोन हजार तक्रारीपैंकी १३७४ तक्रारींत तथ्य असल्याचं आढळून आल्याचं आकडेवारीवरून दिसून येतय. त्यापैकी ९७ टक्के तक्रारींचं निवारण करण्यात आल्याचा दावा, उपनिवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी केलाय.
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणूका घोषित झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. या काळात मतदारांना विविध प्रलोभने देण्याचे प्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात ५८ ठिकाणी पैसे वाटल्याच्या, २७ तक्रारी भेटवस्तू आणि कुपन वाटपाच्या, ३३ मद्य वाटपाच्या तक्रारी आणि ६८ ठिकाणी बंदूक दाखवून धमकावण्याचे प्रकार घडल्याची माहिती, दळवी यांनी दिलीय.
पुण्यातून सर्वाधिक तक्रारी….
आचारसंहिता भंगाच्या घटनांची नोंद करण्यासाठी आयोगानं ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL App) हे मोबाइल अँप कार्यान्वित केलं आहे. राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रचाराचा वेगही राज्यभरात वाढलाय. त्यामुळं आता आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस निवडणूक कार्यालयाकडं पडतोय. राज्यात सुमारे दोन हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १३७४ तक्रारीत उल्लंघन झाल्याचं समोर आलंय. यापैकी सर्वाधिक ३५४ तक्रारी पुण्यात, अमरावतीत १९३ तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात १२४ आणि मुंबई शहरात १०५ तक्रारी आल्याची माहीती दळवी यांनी दिली.
काय आहे तक्रारींचे स्वरूप….
बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनरच्या ९७९ तक्रारी दाखल, ८०७ तक्रारीत तथ्य, मद्य वाटपाच्या ३३ तक्रारी, ४ तक्रारीत तथ्य आढळलं. भेटवस्तू वाटपाच्या २३ तक्रारी आल्या यापैकी ४ तक्रारीत तथ्य, पैसे वाटपाच्या ५८ तक्रारी आल्या असून १७ तक्रारीत तथ्य असल्याचं म्हटलंय. वेळ संपल्यावर प्रचार केल्याच्या १५० तक्रारी आल्या असून यापैकी १०२ तक्रारीत तथ्य असल्याचं आढळलं. बंदुकीचा धाक दाखवण्याच्या ६८ तक्रारी आल्या असून यापैकी ४८ तक्रारीत तथ्य असल्याचं दिसून आलंय. अन्य ५९१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ३६५ तक्रारीत तथ्य असल्याचं दिसून आलंय.
कशी करता येते तक्रार…
आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा आयओएस या ऍपवरून ‘सी-व्हिजिल’ डाऊनलोड करता येतं. डाऊनलोड केल्यानंतर अँपवर स्वतःची माहिती भरावी. आपल्या तक्रारीबाबत माहिती फोटो, व्हिडीओसह अपलोड करणं आश्यक आहे. सदर माहिती अपलोड झाल्यानंतर तक्रार क्रमांक करता येते. निवडणूक आयोगाकडं तक्रार नोंद झाल्यानंतर ती क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वर्ग केली जाते. अवघ्या १५ मिनिटांत त्याची शहनिशा करून तथ्य आढळल्यास कार्यवाही केली जाते. तसेच सदर कारवाईची माहिती तक्रारदारांना देण्यात येते.