
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या प्रश्नासंबंधी आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सकाळी सविस्तर चर्चा झाली खरी मात्र सायंकाळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोमणा लगावला. काही झालं तरी ठाकरी बाणा कायमच असल्याचं यातून दिसून आलं.
आज शनिवारी गोरेगाव येथील वडापाव महोत्सवासाठी राज ठाकरेंची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अशोक वैद्य यांचा वडापाव आज लंडनमध्ये पोहोचला आहे. सचिन तेंडुलकर यांचे गुरु आचरेकर सचिनला शिकवताना एक रुपया स्टंपवर ठेवायचे आणि तो पडला नाही पाहिजे असं सांगून संध्याकाळी त्याला तो रुपया वडापासाठी द्यायचे. दिवसभर रुपया पडू न देता सचिन तेंडुलकर संध्याकाळी वडापाव खायचा.
वडापावची महती सांगताना त्यांनी विद्यमान सरकारवरही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला वडा अजित पवार आहे का ? की अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या मधला वडा एकनाथ शिंदे आहेत… की आणखी वेगळं! असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ह्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे मंत्री महोदय दादा भुसे ह्यांच्यासोबत माझ्या घरी ‘शिवतीर्था’वर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत ‘नागरिकांकडून होणारी अमाप टोलवसुली, टोलनाक्यांमधून होणाऱ्या रहदारीचं सर्वेक्षण ह्या संबंधीची माहिती आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहचवू’ असं मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, त्या टोलविषयीची माहिती तसंच ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठी पाट्यांचा आदेश आणि कायदा पायदळी तुडविणाऱ्यांना वेळीच कडक शासन करावं’ ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली असे राज ठाकरे यांनी सांगितले.
माझ्यासोबत पक्षाचे नेते व आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते, त्यांनीही आपल्या मतदारसंघातील आणि महानगरातील महत्त्वाचे विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. सर्वच मुद्द्यांचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावलं उचलेल ही अपेक्षा आहे असे राज ठाकरे म्हणाले .
राज ठाकरेंनी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या होत्या. तर संध्याकाळी मात्र चिमटा काढत त्यांनी वडापावमधल्या वड्याची उपमा मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांच्या या कोपरखळीची चर्चा होत आहे.