
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुका वारकरी सांप्रदायाच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या पुर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या तांबडा मारूती, दत्त घाट ते पुंडलीक मंदिर अशा नगर प्रदक्षिणा सोहळ्यात तालुक्यातुन पंढरपूरला गेलेल्या सुमारे दोन ते अडीज हजार भाविकांनी उपस्थिती लावली. अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि विठू नामाजा गजर करत हा प्रदक्षिणा सोहळा पार पडला. समस्त राजापूर तालुक्यातील वारकऱ्यांनी विठूरायाच्या नामाचा गजर करत पंढरपूर भक्तीनगरीत एक वेगळा आदर्श निर्माण केला.
राजापूर तालुक्यातून पंढरपूर येथे कार्तिकी वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढत असून यात्रेच्या नियोजनासाठी यात्रेपूर्वी राजापूर तालुक्यातील वारकरी मंडळीची बैठक पार पडली होती. या बैठकीत संप्रदायाच्या वतीने नगर प्रदक्षिणा सोहळयाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे हा सोहळा पार पडला.
या सोहळ्यात राजापूर तालुक्यातील सर्व भागातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. राजापूर तालुका वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही नामदिंडी तथा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला. या सोहळयात तालुक्याच्या विविध भागातील वारकरी मंडळी मोठया भक्तीभावाने आणि उत्सवाने सहभागी झाले होते. गावागावातील प्रमुख मंडळीनी पुढाकार घेत दिंडी सोहळा पार पडला. दिंडी सोहळयाचे हे चौथे वर्ष होते.
यामध्ये याच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य व भाविक मोठया संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. या प्रदक्षिणा सोहळयात विठ् नामाजा गजर करत समस्त राजापूरकरांनी भक्तीचा आणि एकतेचा जणू संदेशच दिला. दिंडीतील सहभागी वारकऱ्यांचे रविंद्र नागरेकर यांनी आभार मानले. हरिभक्तीचा हा ठेवा अखंड जपताना आपापल्या गावात हरिनामाची ज्योत अखंडत तेवत ठेवण्याचे आवाहन श्री. नागरेकर यांनी यावेळी केले.