जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून, उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी बुधवारी व्यक्त केला.
नवी दिल्लीतील भारत-प्रशांत प्रादेशिक संवादात बोलताना सीतारामन् म्हणाल्या की, जागतिक आव्हाने असूनही, भारताचा आर्थिक विकास दर या वर्षात सात टक्क्यांपेक्षा किंचित कमी राहण्याचा अंदाज आहे, जो प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. आयएमएफच्या सामान्यतः पुराणमतवादी अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्था 2027 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार आहे, कारण त्याचे सकल देशांतर्गत उत्पादन पाच ट्रिलियन डॉलर्सच्या पातळीवर पोहोचले आहे. 2047 पर्यंत अर्थव्यवस्था विकसित होईल.
भारताच्या ‘ब्ल्यू इकॉनॉमी’बद्दल त्या म्हणाल्या की, ते सकल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे चार टक्के आहे आणि येथे मोठ्या संधी आहेत. सीतारामन् यांनी, भारत-प्रशांत हा निःसंशयपणे जगातील सर्वांत आर्थिकदृष्ट्या गतिमान प्रदेश असल्याचे सांगितले. यात जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 60 टक्के आणि जागतिक व्यापारी व्यापाराच्या सुमारे 50 टक्के समावेश आहे. दुसरीकडे, भारत-प्रशांत हा भू-राजकीयदृष्ट्या विवादित प्रदेश आहे, जो मोठ्या शक्तींमधील स्पर्धेमुळे प्रभावित होत आहे. भारत आपल्या आर्थिक विकासाला गती देत आहे आणि लोकांचा विकास करीत आहे. त्यांना गरिबीतून समृद्धीकडे नेत आहे.
भारताच्या लढाऊवृत्तीचे कौतुक
भारताच्या गौरवाबद्दल सीतारामन् म्हणाल्या की, देशात किंवा जगात कुठेही असो भारतीय अभिमानाने उभे राहतात. जगाने भारताच्या यशाचे आणि अनेक संकटांमध्येही त्याच्या लढाऊवृत्तीचे कौतुक केले जाते. आंतरराष्ट्रीय निर्यातीच्या बाबतीत भारताची जागतिक क्रमवारी 2014 मध्ये 44 व्या स्थानावरून 2023 मध्ये 22 व्या स्थानावर आली आहे.