
करबुडे येथील रुपेश शितप यांच्या बागेतील मुहुर्ताची पेटी वाशीला रवाना
रत्नागिरी: तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रुपेश अनंत शितप यांच्या बागेतील हापूस आंब्याची मुहूर्ताची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये रवाना झाली.
ऑक्टोबर महिन्यात हापूसची पेटी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.हापूसचा आकार मोठा असून या कालावधीत हापूस बाजारात उपलब्ध होत नसल्याने २० हजारांहून अधिक दर मिळेल अशी आशा असल्याचे बागायतदार शितप यांनी सांगितले.यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस उशिरा दाखल झाला.या कालावधीत उन्हाचा कडाका होताच.
रुपेश शितप यांच्या रत्नागिरी मधील भाट्ये येथील आंबा बागेतील एका उंच हापूसच्या झाडाला जुलै महिन्यात मोहोर आल्याचे लक्षात आले. या झाडाला लवकर पालवी फुटून ती जून झालेली होती.याच दरम्यान पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा कडाका सुरू होता.

त्यामुळे झाडाला बसलेल्या ताणामुळे मोहोर आला.पावसाळ्यात मोहोर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर तो सुरक्षित ठेवण्यासाठी बागायतदार शितप यांनी पावले उचलली.
रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी केली.
बागेतील ते झाडं ८०ते ९० फुट उंच असल्यामुळे मोहोराच्या सुरक्षिततेसाठी कसरत करावी लागली.मोहोरानंतर फळ तयार तयार होईपर्यंत श्री.शितप यांनी काळजी घेतली.सुदैवाने त्यांच्या मेहनतीला यशही आलें.
मोठ्या आकाराचे फळ झाल्याचे दिसून आल्यानंतर शितप यांनी फळांची काढणी केली.चार डझनची पेटि म्हणजेच ४८ फळ शितप यांनी वाशी बाजारात विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे पाठवली आहेत.या कालावधीत हापूस बाजारात येत नसल्याने वीस हजारांहून अधिक दर मिळेल अशी अपेक्षा आहे.

पावसात आलेल्या मोहोराची योग्य काळजी घेतल्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात हापूसची चव चाखायला मिळणार आहे.यापूर्वी शितप यांच्या बागेतून दिवाळीनंतर हापूसची पेटी पाठवण्यात आली होती, परंतु ऑक्टोबर महिन्यात प्रथमच हापूसची पेटी बाजारात विक्रीसाठी पाठविल्याचे रुपेश शितप यांनी सांगितले.
दरम्यान हापूसचा हंगाम खऱ्या अर्थाने मार्च ते जून पहिल्या आठवड्यापर्यंत असतो काहीवेळा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आंबा बाजारात उपलब्ध होतो.
परंतु पावसाळा संपल्यानंतर या पध्दतीने आंबा पेटी बाजारात गेल्याची नोंद प्रथमच झाली आहे. अनियमित पावसामुळे झाडांना मोहोर येण्याचे प्रकार घडत असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले.

