
नवीदिल्ली- इस्रायलमध्ये अडलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारताने इस्रायल लष्करासोबत मिळून ऑपरेशन अजय हाती घेतलं आहे. ऑपरेशन अजय अंतर्गत भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांसह २३५ जणांचा समावेश आहे. याआधी पहिल्या तुकडीत २१२ भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत.
भारतीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दाखल झालेल्या दुसऱ्या तुकडीत 235 भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. विमानाने तेल अवीव येथून रात्री 11.02 वाजता उड्डाण केलं होतं. भारतीय दूतावासाने सांगितले की, दूतावासाने तिसर्या तुकडीमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांना ईमेलद्वारे कळवले आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी लोकांना पुन्हा मेसेज केला जाईल.
इस्रायलमधून सुखरुप भारतात परतलेल्या भारतीयांनी भारत सरकारचे आभार मानले. इस्रायलमधील सफेद येथील इलान विद्यापीठातून पीएचडी करणारा भारतीय विद्यार्थी सूर्यकांत तिवारी ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत सुखरुप भारतात परतला. यानंतर सूर्यकांत तिवारी यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, इस्रायलमध्ये भीतीचं वातावरण आहे. तेथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आम्हाला इस्रायलमधून सुरक्षितपणे बाहेर काढल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानतो.
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. 7 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या सुमारे 3000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमवला आहे. या संघर्षामुळे इतर देशांचे नागरिकही इस्रायलमध्ये अडकले आहेत. अनेक भारतीयही इस्रायलमध्ये अडकले आहेत. इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले की, इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आलं आहे.