जिल्हा सोशल मिडिया संयोजक अमोल गायकर यांनी घोषित केली सर्वसमावेशक टीम.
महाराष्ट्र प्रवक्ता न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर २८, २०२३.
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण) ची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर जिल्हा सोशल मिडिया संयोजक श्री. अमोल गायकर यांनी रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा तसेच जिल्ह्यांतर्गत ८ मंडलांची (तालुक्यांची) सर्वसमावेशक टीम आज घोषित केली आहे. जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी या कार्यकारिणीला अंतिम मंजुरी देऊन नवनियुक्त जिल्हा व मंडल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे; तसेच आगामी काळात निवडणुकांच्या धामधुमीत सोशल मिडिया सेलवर मोठी जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली आहे.
नुकतेच सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक श्री. प्रकाश गाडे यांचा रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा दौरा संपन्न झाला. यावेळी त्यांनी रत्नागिरी (दक्षिण) भाजपा कार्यालयात सर्व सोशल मिडिया वॉरियर्सना संबोधित करून ‘शंखनाद २०२४’ अभियानाची माहिती दिली. हे अभियान ‘महाविजय २०२४’ चा सर्वांत महत्त्वाचा भाग असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून मतदार बंधू-भगिनींना प्रभावित करणे आणि विरोधकांना निष्प्रभ करणे ही आव्हाने समोर असल्याने आपण जबाबदार कार्यकर्ते असल्याची जाणीव करून दिली. याशिवाय सोशल मिडिया कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सजग भूमिका निभावणे पक्षाला अभिप्रेत असून, फोटो किंवा व्हिडीओ शूट करण्यात आपला वेळ व्यतीत करू नये अशा सूचनाही देण्यात आल्या.
याबाबत माध्यमांना माहिती देताना जिल्हा संयोजक श्री. अमोल गायकर म्हणाले, “मा. मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे साहेब, माझे मार्गदर्शक व माजी खासदार डॉ. निलेश राणे साहेब, कोकणचे नेते सा. बां. मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष मा. राजेशजी सावंत साहेब तसेच अन्य वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी ज्या उद्देशाने माझ्यावर जिल्ह्याच्या सोशल मिडिया सेलची जबाबदारी सोपवली आहे तो उद्देश सफल करण्यासाठी मी व माझी संपूर्ण नवनियुक्त टीम कटिबद्ध आहोत. त्यांचा विश्वास सार्थ ठरवतानाच संघटना कोकणी जनमानसात रूजवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. पक्षाचे ‘शतप्रतिशत भाजपा’ हे धोरण सार्थ ठरवण्यासाठी आगामी काळातील आव्हाने पेलण्यास आम्ही सक्षम आहोत.”