आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर राजवाड्याप्रमाणे सजले तर मंदिर परिसरात उष्णतेपासून संरक्षणासाठी शेडनेटचे छत

Spread the love

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरातील पेशवेकालीन सभा मंडपला आणि रुक्मिणी सभामंडपाला आता शाही साज चढवण्यात आला असून विठुरायाची राऊळी एखाद्या राजवाड्याप्रमाणे सजू लागली आहे. पेशवेकालीन सागवानी सभा मंडपात रंगीबेरंगी पडदे, झुंबर आणि आकर्षक फुलांच्या सजावटीने संपूर्ण मंदिराचे रुपडे पालटले गेले आहे. 

विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपाला राजवाड्याचे स्वरुप

आषाढी यात्रेच्या सोहळ्यात मोजके दिवस शिल्लक आहेत. अशातच पंढरपुरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरु आहे. विठ्ठल मंदिर देखील संपूर्णपणे सजावट करुन भाविकांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी सज्ज करण्याची तयारी होत आहे. यामध्येच विठ्ठल मंदिरातील पेशवेकालीन सभामंडप आणि रुक्मिणी मातेचा सभामंडप हा आकर्षक पद्धतीने सजवण्यात येत आहे. यासाठी केशरी आणि पिवळ्या अशा मलमली कापडाची सजावट, आकर्षक छत, फुलांचे झुंबर, फुलांच्या माळा, आकर्षक प्रकाश योजना अशा माध्यमातून संपूर्ण सभा मंडप सजवून टाकण्यात येत आहे, याचबरोबर लायटिंगमध्ये निर्माण करण्यात आलेली सर्व संतांची तैलचित्र देखील या ठिकाणी लावण्यात आली आहेत. एखाद्या शाही राजवाड्याचे स्वरुप विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपास आले आहे. या सजावटीचे काम सध्या जरी प्राथमिक अवस्थेत असले तरी पुढील आठवड्याभरात ही संपूर्ण सजावट पूर्ण होणार आहे. या शाही सजावटीमुळे विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना एखाद्या राजवाड्यात आल्याचा आनंद मिळणार आहे.

उष्णतेपासून संरक्षणासाठी शेडनेटचे छत

सध्या उष्णतेची तीव्रता वाढत असताना एबीपी माझाच्या बातमीनंतर आता भाविकांना ऊन लागू नये म्हणून मंदिर परिसरात सर्व मार्गावर उष्णतारोधक पांढऱ्या रंगांचे पट्टे मारण्यात आले आहे. डोक्यावर शेडनेटचे छत दिल्याने आता भाविकांना अनवाणी पायाने मंदिर परिसरात फिरण्याचा आनंद घेता येत आहे. आता दर्शन रांगेत देखील पायाखाली या उष्णतारोधक पांढऱ्या रंगांचे पट्टे देऊन त्यावर मॅट टाकण्यात येणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. 

यात्रा काळात हजारोच्या संख्येने भाविक हे मंदिर परिसरात येत असतात. यातच यंदा सूर्यदेवाची प्रकोप इतका वाढत चालल्याने अशा उन्हात भाविकांना उष्माघाताचा त्रास जाणवू नये यासाठी शासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच सध्या मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी बांधलेले कापडी मंडप काढून तेथे जास्त उंची असलेले आणि यात प्रकाश आणि हवेची व्यवस्था असणारे मंडप उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page