
अमरावती- अमरावती लोकसभा निवडणुकीवर आमदार बच्चू कडू यांनी देखील दावा केला असून प्रहार उमेदवार देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.तर राज्यात विधानसभेच्या १५ जागा लढवणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.
मी स्वतः अपक्ष लोकसभेची निवडणूक लढलो होतो. तेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मला पाठिंबा नव्हता आणि त्यात आम्ही फक्त पाच हजार मतांनी पडलो होतो. आता बऱ्यापैकी आम्ही तयारी केलेली आहे. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर आम्ही राजकीय ताकद बऱ्यापैकी निर्माण केली आहे आणि अमरावती लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत.
युती नाही झाली तर अपक्ष आम्ही लढू असे बच्चू कडू यांनी सांगितले. तर विधानसभेसाठी राज्यात १५ ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे करू, शिंदे आणि भाजपचा फॉर्म्युला ठरला असला तरी आम्हाला त्यात जागा नाही मिळाल्या तर आम्ही पंधराही जागी प्रहारच्या अपक्ष उमेदवार उभे करून विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.