
मुंबई:- शिवसेना पक्षामध्ये झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे आता सावध पुर्ण पावले टाकत आहेत. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. गावगाड्यात आपला पक्ष पोहोचवण्यासाठी उद्धव ठाकरे हे ‘मिशन चावडी’ राबवणार आहेत. दरम्यान हे मिशन राबवत असताना उद्धव ठाकरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चावडीवर प्रचार करणारे हे फक्त उद्धव ठाकरे यांनाच माहीत असणार, अशी व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षाला पडलेले खिंडार भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन पुन्हा पक्ष मजबूत व्हावा, यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करणार आहेत. २०२४ च्या आगामी निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून लढवण्यासाठी तसेच मशाल हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी मिशन चावडी हे उद्धव ठाकरेंचे अभियान शिवसेनेला संजीवनी देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.