विराट-राहुलच्या संयमाने ऑस्ट्रेलियाला लोळवले.

Spread the love

भारताच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात संस्मरणीय विजयाने.

जनशक्तीचा दबाव न्यूज | चेन्नई | ऑक्टोबर १०, २०२३.

२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या २ धावांमध्ये ईशान किशन, कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयश अय्यर हे तीन महारथी गारद झाल्याने ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला विश्वचषक २०२३ मधील यजमान भारताचा पहिला सामना रनमशीन विराट कोहली व यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुल यांच्या समयोचित संयमी खेळीच्या जोरावर भारताने ६ गडी व ५२ चेंडू राखून जिंकला. अखेरपर्यंत नाबाद राहून षट्काराने विजय मिळवून देणारा लोकेश राहुल सामनावीराचा मानकरी ठरला.

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवण्यात आलेल्या दिवस-रात्र सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र तिसऱ्याच षटकात भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रित बुमराहने सलामीवीर मिचेल मार्शला विराट कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. विराटचा हा विश्वचषकातील विक्रमी १५ वा झेल होता. त्याने यापूर्वी माजी कर्णधार अनिल कुंबळेचा १४ झेलांचा विक्रम मोडीत काढला. सुरुवातीला मिळालेल्या या धक्क्यातून डेव्हिड वॉर्नर व स्टीव्हन स्मिथने सावरण्याचा प्रयत्न करत अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर भारतीय ताफ्यातील फिरकी गोलंदाजांनी कांगारूंना खेळपट्टीवर अक्षरशः नाचवले. सुरुवातीला कुलदीप यादव, त्यानंतर सर रविंद्र जडेजा आणि शेवटी रविचंद्रन अश्विन यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खेळपट्टीवर मोठे फटके मारण्यापासून रोखले. आणि दबाव निर्माण केला. याच दबावाखाली बऱ्याचश्या फलंदाजांनी स्थिरावल्यानंतरही विकेट फेकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १ बाद ७४ वरून ५ बाद १२० आणि पुढे त्याच गतीने कोसळला. उत्कृष्ट गोलंदाजी, त्याला साजेसं क्षेत्ररक्षण आणि कर्णधार रोहित शर्माचे अचूक निर्णय यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला ४९.२ षटकांत १९९ धावांत रोखण्यात भारताला यश मिळाले.

मात्र त्यानंतर ईशान किशन ‘सुवर्णभोपळा’ घेऊन तंबूत परतला. थोड्याच वेळात रोहित शर्माने आपला नाहक बळी दिला. श्रेयश अय्यरचा झेल वॉर्नरने टिपल्यानंतर भारतीय गोटात चिंता आणि भीती निर्माण झाली होती. ३ मोहरे टिपल्यानंतर जोशात आलेल्या ऑस्ट्रेलियन तोफखान्याला निष्प्रभ करण्याची जबाबदारी आता भारताचा सर्वाधिक अनुभवी आणि विश्वासार्ह फलंदाज विराट कोहलीच्या खांद्यावर होती. आपली जबाबदारी निभावताना आवश्यक सावधगिरी बाळगत लोकेश राहुलला धीर देत खेळपट्टीवर नांगर टाकला. यात त्याचा उडालेला एकमेव झेल मिचेल  मार्शने सोडला. मिळालेल्या जीवदानाचा यथाशक्ती लाभ घेत त्याने ऑस्ट्रेलियन माऱ्याची हवा पूर्णपणे काढून टाकली. भारताकडून विश्वचषक २०२३ मधील पहिले अर्धशतक साजरे करण्याचा मान पटकावतानाच आजच्या खेळीनंतर आय.सी.सी.च्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज बनला आहे.

चौथ्या गड्यासाठी तब्बल १६५ धावांची भागीदारी केल्यानंतर जॉश हेझलवुडच्या एका अप्रतिम चेंडूवर मार्नस लब्युश्चेंजकडे झेल देत विराट माघारी परतला. तोपर्यंत त्याने आपले काम पूर्ण केले होते. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने संघाची अधिक पडझड होऊ न देता राहुलच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुल ९७ तर हार्दिक ११ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवुडने ३ तर स्टार्कने १ बळी बाद केला.

या विजयामुळे भारताला २ गुण मिळाले असून भारताचा पुढील सामना येत्या बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी अफगाणीस्तानविरुद्ध दिल्ली येथे होणार असून १२ तारखेला ऑस्ट्रेलियाची कमालीच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया (फलंदाजी) वॉर्नर– ४१(५२), स्मिथ- ४६(७१), लब्युश्चेंज- २७(४१), स्टार्क- २८(३५)

भारत (गोलंदाजी) बुमराह (१०-३५-२), कुलदीप यादव (१०-४२-२) जडेजा (१०-२-२८-३)

भारत (फलंदाजी) विराट- ८५(११६), के.एल. राहुल- ९७(११५)

ऑस्ट्रेलिया (गोलंदाजी) हेझलवुड (९-१-३८-३), स्टार्क (८-३१-१) 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page