
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. वीर सावरकर यांची पदवी पुन्हा भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने भाजप आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमध्ये एकमत होताना देखील दिसत आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा त्यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. भाजप सरकारने लवकरात लवकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी ठाकरे गट करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी लंडनमधून परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास घोषणा केली आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह भाजप नेते देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी सावरकर यांच्या कार्याला सलाम केला आहे. तसेच सावरकर यांची पदवी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमावेळी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सावरकर हे केवळ एक नाव नाही, ते एक विचार आहेत, एक संस्था आहेत, एक अखंड ज्वाला आहेत. अत्यंत तरुण वयात ‘स्वातंत्र्य माझे ध्येय’ अशी शपथ घेऊन त्यांनी क्रांतीच्या महासागरात उडी घेतली. अभिनव भारत, लंडनमधील इंडिया हाऊस, जोसेफ मॅझिनीचे आत्मचरित्र, ही केवळ स्थळं व ग्रंथ नव्हते तर ती क्रांतीची प्रयोगशाळा होती, ज्यामध्ये सावरकरांनी देशप्रेमाची आग पेटवली. आपल्या लेखणीतून त्यांनी तरुणांच्या मनात स्वतंत्रतेची ज्योत चेतवली. म्हणूनच इंग्रज सत्ताधाऱ्यांना सावरकरांचा उल्लेख ‘सर्वात धोकादायक क्रांतिकारक’ असा करावा लागला,” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/DKLvKXSPWiN/?igsh=MXN3YzBpcGVmcDZxZw==
काळकोठडीतील अंधार प्रकाशमान केला…
पुढे ते म्हणाले की, “1857 च्या उठावाला ‘भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम’ असे नवे परिमाण देत सावरकरांनी ब्रिटिशांनी खोटेपणाने लिहिलेला इतिहास नव्याने देशवासियांसमोर आणला तसेच आणि अंदमानच्या काळकोठडीत, दुहेरी जन्मठेपेच्या छायेत, त्यांनी लिहिलेलं ‘अनादि मी, अनंत मी’ हे गीत आजही देशप्रेमाची अमर प्रेरणा बनून उठतं. मुख्यमंत्री म्हणाले, “सावरकरांना केवळ तुरुंगात डांबणं पुरेसं नव्हतं, कारण त्यांच्या विचारांना बेड्या घालणं शक्यच नव्हतं. त्यांच्या आत्मबलामुळेच त्यांनी 11 वर्षांचा काळकोठडीतील अंधार प्रकाशमान केला.”
“सावरकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूतही होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत महाड येथील चवदार तळ्याच्या लढ्यात त्यांनी साक्ष देऊन सामाजिक समतेचा इतिहास घडवला. मराठी भाषेला नवे शब्द देत तिला समृद्ध करणाऱ्या सावरकरांची साहित्यसेवा देखील अमूल्य आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या जयंतीदिन मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, “या संशोधन केंद्राला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार आहे,” अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी सावरकर यांच्या जयंतीदिनी केली आहे. त्यांच्या या घोषणेचे स्वागत शिवसेना ठाकरे गटाने देखील केले आहे.