“चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या माध्यमातून तुमच्या समस्या दूर करण्यासाठी भाजपा कटिबद्ध.” – प्रमोद जठार.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | डिसेंबर १२, २०२३.
भारतीय जनता पक्षाचे नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार, चिपळूण-संगमेश्वर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी भाजपा कार्यकर्त्यांसोबत संगमेश्वर (द.) तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष रूपेश कदम, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सर्वांचे स्वागत केले.
मेघी, बौद्धवाडी येथे संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन भाजपा नेते प्रमोद जठार यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर आंगवली येथील मार्लेश्वर मंदिराला भेट देऊन ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा केली. पुढे हॉटेल गिरीराज रिसॉर्ट, हातीव येथे बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. देवरुख भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना श्री. प्रमोद जठार यांनी “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा खासदार निवडून येईल आणि संसदेत मा. मोदीजींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान होण्यासाठी समर्थन देईल” असा आशावाद व्यक्त केला.
देवरुखजवळील हरपुडे येथे भाजपाच्या माध्यमातून मंजूर होऊन आलेल्या रस्त्याचा छोटेखानी भूमिपूजन समारंभ, तळवडे येथे पाखाडीचे भूमिपूजन तर वाशी तर्फे संगमेश्वर येथे संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी भाजपा नेत्यांनी उपस्थिती लावली. यानंतर उजगाव, आंबवली तळीची वाडी, ब्राह्मण वाडी तसेच धामापूर येथील विविध विकासकामांच्या भूमीपूजन समारंभांचा धडाका भाजपाच्या माध्यमातून पार पडला.
यानंतर ताम्हाणे येथे बूथ प्रमुख व प्रमुख स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव आणि लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी संबोधित केले. यावेळी परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर बोट ठेवत शिवसेना (ठाकरे गट) नेतृत्त्वाच्या मागील १० वर्षांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मोदी सरकारच्या माध्यमातून त्याच कालावधीत झालेल्या कामांची आणि देशाच्या विकासाभिमुख कामगिरीची माहिती दिली. “स्थानिक नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्त्वाच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्यात सपशेल अपयशी ठरले असून कोकणाची दयनीय अवस्था बदलायची असेल तर आता खासदार बदलण्याची गरज आहे. यावेळी लोकांनी एकजूट केली नाही तर कोकणातील येणाऱ्या पिढ्या अजून गर्तेत सापडतील. त्यामुळे अजूनही वेळ शिल्लक आहे; तिकीट कोणालाही मिलो आपला खासदार आणि आपल्याच विचारांचा आमदार यापुढील काळात निवडून द्यायचा आहे. यासाठी शक्य असेल त्या सर्व ठिकाणी विकासाचे प्रचारक म्हणून आपले कर्तव्य बजावा. स्वतः भाजपाला मत द्या आणि इतरांनाही भाजपालाच मत देण्यासाठी प्रेरित करा.” असे सूचक वक्तव्य दोघांनीही आपल्या संबोधनातून शैलीदार पद्धतीने केले.
यावेळी अनेक तरुण कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये उत्स्फूर्त पक्षप्रवेश केला. आगामी काळात त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचे आश्वासन तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी दिले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोप्रतीनिधी, ज्येष्ठ तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.