रत्नागिरी ; प्रतिनिधी (योगेश मुळे) “उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेकरीता आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. मात्र मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संघटनेच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.” असे भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांनी म्हटले आहे.
▪️संघटनेच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकार वेळ काढत असल्याने मुंबईत ५ लाख महिलांच्या साथीने महामोर्चा व बेमुदत आंदोलन करण्यासंदर्भात निग्रह राजापूर विधानसभा क्षेत्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व उमेदच्या महिलांनी सौ. उल्का विश्वासराव यांच्यासमोर व्यक्त केला.
यावर सौ. विश्वासराव यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढली मात्र उपलब्ध अवधीत आमचा विषय मार्गी लावावा असे संघटनेचे म्हणणे असल्याने त्यांनी अत्यंत जलद हालचाली सुरु केल्या. यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना लिहिलेल्या पत्रात सौ. विश्वासराव म्हणाल्या, “उमेद अभियानातील संबंधित मागण्या ऐकून घेण्यासाठी मा. मंत्री महोदयांनी आपला वेळ द्यावा व प्रलंबित असलेल्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य होण्यासाठी आपल्याकडून शासन स्तरावर प्रयत्न करावा.”
▪️ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन या बैठकीसाठी उपस्थित राहिले. यामधील संघटनेची भूमिका जाणून घेत त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. चर्चेअंती सदर मागण्यांप्रति सरकार अत्यंत संवेदनशील विचार करत असून लवकरच याचा सकारात्मक परिणाम दिसेल. तूर्तास हाती घेत असलेले आंदोलन तातडीने रद्द करावे व सरकारला सहकार्य करावे असे आवाहन श्री. गिरीश महाजन यांनी केले. या आश्वासनावर संतुष्ट होऊन उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी कल्याणकारी संघटनेने आपले आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन व सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांचे तत्पर सहकार्याबद्दल आभार मानले.