
मुंबई- राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही. ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचे नामोनिशाणही ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. कम ऑन किल मी.. हा नाना पाटेकरांच्या प्रहार चित्रपटातील डॉयलॉग मारत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला जाहीर आव्हान दिलं. मुंबई घशात घालण्यासाठी भाजप मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही. पण राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीचे संकेत दिले.
शिवसेना अजूनही तरुण आहे अजून ही तरुणच राहणार आहे. तिकडे चोरांचा बाजार भरला होता. पहिल्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेब यांनी शिवाजी पार्कत मेळावा घेतला होता. त्यावेळी मी माझ्या माच्या मांडीवर बसलो होतो. राजकारणात ज्यांना पोरं होतं नाहीत ते आमच्यावर टीका करतात. तुला पोर होत नाहीत त्याला आम्ही काय करू? किती पाहिजे आहेत तेवढी पोर घे. भाजपला स्वतःची पोरं नाहीत त्यामुळे त्यांना अशी घ्यावी लागतात. ते आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत. काही जण म्हणत आहेत, युती होणार नाही. दोघे एकत्र येणार नाहीत. त्यांचाही उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही आमचं बघू काय करायचं ते. तुम्ही तुमचं बघा. असे उध्दव ठाकरे म्हणाले.
एवढी माणसं चोरली, पक्ष चोरला, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही? असा प्रश्न त्यांना पडला असेल. पण शिवसैनिकांनी रक्त आटवून ही शिवसेना उभारली आहे. पैसे फेकून नव्हे तर कष्ट करून ही संपत्ती जमवली आहे. कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार. पण हे होऊ नये म्हणून इकडे तिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर काय होणार? मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहेत. मुंबई आमचीच आहे. ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर तुमचे नामोनिशाण ठेवणार नाही. भाजपच्या निष्ठावंतांची मला दया येते. किती काळ तुम्ही फक्त सतरंज्याच उचलणार? आता तर तुम्ही पार सतरंजीची खाली गेलात. तिथून बाहेर या आणि तुमच्या नेतृत्त्वाला तुमची छाती किती इंचाची आहे ते एकदा दाखवून द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे भाजपवर बरसले.