मनोज जरांगे पाटील आज साताऱ्यात आले होते. साताऱ्यात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी आरक्षणावर चर्चा केली. मराठा आरक्षणाचं आंदोलन किती टप्प्यात होणार आहे आणि सरकारने काय आश्वासन दिलं यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
सातारा/18 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. उदयनराजे यांनीही त्यांना आंदोलन करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तुम्हाला कुटुंब आहे. त्यांना तुमची गरज आहे. त्यामुळे काळजी घ्या, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा देत जातिनिहाय जनगणना करण्याची मागणीही केली.
जालन्यात काल ओबीसींची रॅली झाली. यावेळी ओबीसी समाज 150 मराठा आमदारांना पाडतील, असा इशारा देण्यात आला. त्याबाबत उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. पण हे उत्तर देताना बोलता बोलता आपल्या उमेदवारीवरही भाष्य केलं. पाडा 150 आमदार. मी म्हणतो पाडा. अजून काय बोलू? मीच उभा राहत नाही इलेक्शनला. पाडायचं काय बोलायचं? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला. अंतकरणातून विचार करा. काय बोलायचं? सर्वांनी मनापासून आपण विचार करा. या देशाचे तुकडे करू नका. या देशाची वाट लावू नका. जातीजातीत भांडणं लावू नका; असं आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलं.
▪️लोकांनी जगायचं कसं?
आज मनोज आहे. उद्या दुसरा असेल. मी असेल. काय करायचं ते सांगा. तुम्ही प्रश्न सोडवणार नसाल तर लोकांनी कसं जगायचं? मग यांनी विष खाऊन मेलेलं बरं. प्रत्येकाला कुटुंब असतं. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. मुलं शिकली तर प्रगती होणार.माझं मत एवढंच आहे. जनगणना करा आणि ज्यांना आरक्षण द्यायचं त्यंना द्या. कोणत्याही जातीचा असू द्या, आरक्षण द्या. मला पुढचं बोलायचं नाही. बोलायचं असेल तर भरपूर बोललो असतो. प्रत्येक जण हताश झाला आहे. जातपात सोडून द्या आता, असं उदयनराजे म्हणाले.
▪️आशीर्वाद मिळाल्याने बळ मिळतं
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. लढताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजाचा आशीर्वाद मिळाल्याने बळ मिळतं. कानात सांगितलेलं आणि आशीर्वाद दिलेला सांगायचा नसतो. आम्ही लढणार. गोरगरीबांना न्याय देणार. कुणी कितीही विरोध केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.