दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आला होता पूल:स्थानिकांचा दावा- पर्यटकांनी एकाचवेळी पुलावर गर्दी केल्याने घडली दुर्घटना…

Spread the love

*पुणे /प्रतिनिधी-* पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळातील साकव पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत जवळपास वीस ते पंचवीस वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल आहे. त्यासोबतच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली असून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत सांगितले की, या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर 32 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू…

नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. अपघात झालेला हा पूल २ महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. हा पूल अनेक दशके जुना असून त्याच्या जीर्ण अवस्थेमुळे तो बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊस सुरू झाला आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पुलावर जमा झाले होते. तसेच, आज रविवारचा दिवस असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

त्यासोबतच काही पर्यटकांनी या पुलावरून गाडी घातली. हा लोखंडी पूल अत्यंत जीर्ण झाला होता, इतके वजन एकाच वेळी पुलावर आल्याने त्यावर दाब निर्माण झाला आणि पूल कोसळला. या दुर्घटनेत अनेकजण नदीत पडले आणि वाहून गेल्याची भीती आहे. पूल कोसळल्यानंतर काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नेमके काय घडले?

मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंडमळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकव पूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच, या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंड आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला. आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.

दरम्यान, आता या अपघातावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये सुळे यांनी लिहिले की, “पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे”.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page