सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाटत आहे अस्वस्थ, सलग आठव्या दिवशी बचाव मोहिम सुरू..

Spread the love

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मात्र बोगद्यात अडकलेल्या कामगारांना विविध त्रासाला सामोरं जावं लागत आहे. काही कामगारांना अस्वस्थ वाटत असून काही कामगारांना झोप येत नसल्याचं त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे.

देहराडून- सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र अद्यापही या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आलं नाही. सिलक्यारा इथल्या बोगद्यात अडकलेल्या काही मजुरांना अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांच्यासाठी बोगद्यात काही औषधं पाठवण्यात आली आहेत. बोगद्यात अस्वस्थ वाटल्यानंतर काही कामगारांना झोपही लागली नाही. एवढचं नाही तर अन्नामध्ये सतत फायबरच्या कमतरतेमुळे कामगारांना डोकंदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठता अशा समस्यांना सामोरं जावं लागलं आहे.

कामगारांची जीवन मृत्यूशी झुंज :

उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात मागील 8 दिवसापासून 41 कामगार जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी विविध मशीनचा वापर करण्यात येत आहे. कामगारांना वाचवण्यासाठी शनिवारी इंदूरहून मदत मागवण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सैन्यानंही मोहीम हाती घेतली आहे. सैन्याचे जवान बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका करतील, अशी आशा आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना दैनंदिन गोष्टीसाठीही संघर्ष करावा लागत आहे.

सुका मेवा खाल्ल्यानं होत आहेत अडचणी :

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काजू, बदाम, पॉपकॉर्न, कुरकुरीत पदार्थ खाण्यासाठी पाठवले जात आहेत. पाईपद्वारे कोणत्याही प्रकारचं अन्न पाठवणं शक्य नाही. त्यामुळे कामगारांना मागील 8 दिवस या यंत्रणेसोबतच जगावं लागत आहे. मजुरांना सकाळ संध्याकाळ सुका मेवा खावा लागतो. त्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडणं साहजिक आहे. कामगारांना पाणी, ओआरएस आणि ज्यूस पिण्यासाठी पाठवले जात आहेत. काही कामगारांनी शनिलारी त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलले असून येथील अनेकांची प्रकृती खालावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बहुतेक कामगारांना पोटदुखी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आर सी एस पनवार यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभागानं काही औषधं आत पाठवली आहेत.

कामगारांच्या आरोग्याबाबत काय म्हणतात डॉक्टर :

बोगद्यात काम करणाऱ्या कामगारांना अशा वातावरणात राहण्याची सवय असते. त्यामुळे ते इतर कष्टकरी नागरिकांपेक्षा वेगळे असतात. बोगद्याच्या आतील वातावरण आणि बाहेर काम करणं खूप वेगळं आहे. त्यामुळेच 8 दिवस उलटूनही 41 जणांचं मनोबल कायम आहे. पण आता उशीर होत आहे. असं असलं तरी समस्या आणखी वाढत असल्याचं डॉ के. के त्रिपाठी यांनी सांगितलं. बाहेर आल्यानंतर या कामगारांना इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकते. इतके दिवस आतमध्ये बंद असल्यानंतर कामगारांच्या मानसिक वागण्यात नक्कीच फरक आहे. त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शौचालयापासून ते झोपण्यासाठी कामगार करतात हे उपाय :

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना रोजच्या गोष्टींसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कामगार गेल्या 8 दिवसांपासून शौचासाठी मातीचा ढिगारा वापरत आहेत. झोप आल्यास ते भिंतीला टेकून बसून झोपतात. ढिगारा पुन्हा पडण्याची शक्यता असल्यानं अनेक कामगारांना झोप येत नाही. बोगद्यात अडकलेले कामगार एकमेकांशी बोलून वेळ घालवत आहेत. किती तासात सगळे कामगार बाहेर येतील हे सांगता येत नाही. पीएमओ टीम आली होती. त्यांनी आपल्याला काही सूचनाही दिल्या असून आम्ही नवीन उपाययोजनेवर काम करत आहोत. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे” असं उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page