कोल्हे-लांडेंची रस्सीखेच संपली! शिरुर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, पवारांनी निर्णय केला जाहीर

Spread the love

पुणे – लोकसभा निवडणूक वर्षभरावर असतानाच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा याच जागेसाठी इच्छुक असतानाच विलास लांडे यांनीही त्याच मतदारसंघाचे तिकीट मिळवण्यासाठी दंड थोपटले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंच्या पारड्यात आपले मत टाकत राष्ट्रवादीकडून कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र विलास लांडेंचा जागेवरील दावा कायम आहे.

उमेदवारावर शिक्कामोर्तब निवडणुका लागतील तेव्हा होईल, असा सूचक इशारा विलास लांडे यांनी दिला आहे. म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठकीनंतर सगळं काही आलबेल आहे, असं लांडेंच्या वक्तव्यानंतर दिसत नाही.

विलास लांडे यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी परिसरात झळकले होते. त्यामुळे शिरूर लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत होती. विलास लांडेंच्या या बॅनर्सबद्दल अमोल कोल्हेंना विचारले असता त्यांनी ‘शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही’ असे म्हणत आपले इरादे स्पष्ट केले होते. तसेच ‘पवार साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण’ हे मला मान्य आहे, असे म्हणत कोल्हेंनी शिरूर लोकसभेच्या उमेदवारीचा चेंडू पवारांकडे टोलवला होता.

आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत. पुण्यातील मार्केट यार्डच्या शिरूर लोकसभेसाठी पक्षातील इच्छुकांची संख्या पाहता अंतर्गत गट बाजी निर्माण होईल का? याची चिंता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना लागली होती. मात्र, आजच्या बैठकीनंतर पवारांनी कोल्हे यांचं नाव जाहीर केल्यानंतर विलास लांडे यांनी स्वागत केले.निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील बैठकीसोबतच ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page