
लांजा : कौटुंबिक कलह आणि जमिनीच्या वादातून ४८ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना १ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हर्चे देऊळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्चे देऊळवाडी येथील विनोद गोपाळ शेलार (वय ४८) आणि सुनील अशोक शेलार यांच्यामध्ये जमीन जागेवरून वाद सुरू आहेत. यातील फिर्यादी विनोद गोपाळ शेलार हे १ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातील हॉलमध्ये उभे होते. मात्र त्यांच्यात असलेल्या जमिनीच्या वादावरून सुनील शेलार याने विनोद शेलार यांनी घराचे हॉलमधील खुर्ची घेताना झालेल्या आवाजाच्या कारणावरून
त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. या दरम्यान अंजनी अशोक शेलार (वय ५२) व
रिमा सुनील शेलार या देखील त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांनी विनोद शेलार यांना हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्याचप्रमाणे सुनील शेलार यांनी कोणत्यातरी लोखंडी अवजाराने विनोद यांच्या गुप्तांगावर मारून दुखापत केली. त्याचप्रमाणे ठार मारण्याची धमकी
दिली. या घटनेत विनोद गोपाळ शेलार जखमी झाले होते.
या प्रकरणी विनोद शेलार यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अंजनी अशोक शेलार, रिमा सुनील शेलार आणि सुनील अशोक शेलार अशा तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२),११८(१), ३५२,३५१ ( २), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.