
अन्यथा तिव्र आंदोलन करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा इशारा
राजापूर / प्रतिनिधी- सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मंगळवारी या ठिकाणी भेट देवून या पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला.
सागरी महामार्गावरील अणसुरे आणि सागवे या दोन गावांना जोडणारा हा पूल रत्नागिरीहून सिंधुदुर्गला जाण्या-येण्यासाठी महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर कमी होत होते. हा पुल बांधल्यापासून सुमारे पाच वर्षातच नादुरूस्त झाला. दांडे अणसुरे बाजूकडील पुलाचा काही भाग खचल्यामुळे तो धोकादायक झाला होता. त्यामुळे यावर्षी मार्च महिन्यापासून हा पूल वाहतूकीसाठी बंद करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या दुरूस्तीचे काम 10 कोटी रूपये खर्चुन घारपूरे कन्स्ट्रक्शन ही नामवंत कंपनी करीत आहेत.
या पुलाचा पाया पुर्ण झाला असून वरील एक पीलर व स्लॅब बाकी आहे. मुळ पुलाचा जागी असलेला भराव हटवून एक पीलर वाढवून पुलाची लांबी वाढविली आहे. यासाठी अपेक्षित कालावधी तीन महिन्याचा असताना आता आठ-नऊ महिने होत आले तरी पुल वाहतूकीसाठी सुरू न झाल्याने दोन्हीही जिल्ह्यातील वाहनचालक व जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देवगडमधील जनतेला ओरोस मुख्यालयापेक्षा व रूग्णालयापेक्षा रत्नागिरी मुख्यालय व रूग्णालय जवळ पडते. तसेच रत्नागिरी येथील अनेक शिक्षण संस्थांमधून देवगडमधील शेकडो मुले शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे साखरी नाटे, जैतापूर या भागातील खलाशी, मच्छिमारी वर्ग यांना अनेक कारणास्तव देवगड तालुक्यात यावे लागते. सागवे, कात्रादेवी मधील जनतेला पडेल कॅन्टीन हे महत्वाचे खरेदीचे मार्केट आहे. तसेच या भागातील जनतेला अती तातडीच्या वैद्यकीय सुविधांसाठी देवगड शहर गाठावे लागते.
मात्र सद्यस्थितीत हा पुल वाहतूकीसाठी बंद असल्याने डोंगरतिठा मार्गे फेरा घालुन सिंधुदुर्ग विशेषत: देवगड मालवण मधील जनतेला रत्नागिरीकडे जावे लागत आहे. पुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत येथील भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी तात्काळ या पुलाच्या कामाची पाहणी केली व संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, अरविंद लांजेकर, सौ. सुयोगा जठार, महादेव गोठणकर, विद्याधर राणे, राजा काजवे, जब्बार काझी, रविंद्र अवसरे, सिकंदर करंगटुकर, अमित नार्वेकर, नरसु कांबळे, पंकज गुरव, रामदास गावकर, रंजन गावकर, रूपेश कणेरी, वसंत पाटील, उत्तम पावसकर, विनायक कुवेसकर, साई करंगुटकर, सचिन शिवणेकर, साईश भाटकर, संदिप शिंदे, शैलेंद्र मांजरेकर, देवा भोसले, दिपक गावकर, श्री.गवाणकर, विजय राऊत, परेश आडविलकर, विजय राऊत, प्रथमेश बावकर, सुनिल बावकर, प्रकाश दांडेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे याकरीता या विभागातील अणसुरे, सागवे, मिठगवाणे, माडबन, जैतापूर, कुवेशी या परिसरातील भाजपा कार्यकर्ते व जनता बुधवारी अणसुरे येथील गिरेश्वर यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.