चिपळूणच्या जनतेने नगर परिषदेची सत्ता द्यावी, स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करू- प्रशांत यादव…

Spread the love

चिपळूण- चिपळूण शहराच्या विकासाला खो घालणारी ब्लु आणि रेड लाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तसेच नदीतील गाळ उपशासाठी लागणारा निधी त्वरित मिळवण्यासाठी निवडणुकीनंतर लगेच पाठपुरावा सुरू केला जाईल, तसेच चिपळूणच्या जनतेने शिवसेना भाजप युतीला आशीर्वाद दिले आणि नगरपरिषदेची सत्ता हाती दिली तर चिपळूण शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करून स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करू असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांत यादव यांनी व्यक्त केला. चिपळूण शहरासाठी निधी कमी पडणार नाही, याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ असेही ते म्हणाले.

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली असून नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहे.निवडणूक प्रभारी म्हणून प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध अशी प्रचार यंत्रणा राबवली जात असून पालकमंत्री उदय सामंत स्वतः लक्ष देऊन आहेत. पूर्ण निवडणूक प्रचार आणि शहर विकासासंदर्भात भाजप नेते प्रशांत यादव यांनी स्पष्टपणे युतीची भूमिका व शहरविकासाचे व्हिजन समोर ठेवले. ते म्हणाले शहराला पूर्ण पुरमुक्त करायचे असेल तर नदीतील गाळ काढण्याची प्रक्रिया वेगवान करावी लागेल,आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की राज्यात सत्ता आपली आहे, तसेच पालकमंत्री देखील या विषयाकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे निवडणूकी नंतर लगेच या विषयाचा पाठपुरावा सुरू करू आणि गाळ काढण्यासाठी लागणारा अधिकचा निधी आणून गाळ उपसण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल तसेच ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

ब्लु आणि रेड लाईन बाबत प्रशांत यादव म्हणाले या विषयाबाबत यापूर्वीच सन्मा. मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी अत्यंत विस्तृतपणे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडला आहे आणि समाधानकारक बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात समिती स्थापन करून फेर सर्वेक्षण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे फक्त चिपळूणचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी ब्लु आणि रेड लाईनचा प्रश्न आहे तो निकाली निघेल आणि शहर विकासाचा मार्ग मोकळा होईल. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील रस्त्यांचा व वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी तातडीने निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि मला विश्वास आहे, आम्ही जे उमेदवार दिले आहेत ते सर्व सर्वसामान्य जनतेमध्ये वावरणारे आहेत. त्यांना लोकांची जाण आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे असे आमचे सर्व उमेदवार आहेत. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील अगदी सर्वसामान्य जनतेमधला आहे. सतत जनतेमध्ये राहणारा असा कार्यकर्ता आम्ही नगराध्यक्ष पदासाठी दिला आहे. त्यामुळे शहरातील समस्या आणि त्याचा पुरेपूर अभ्यास त्यांच्याकडे असल्याने शहर विकासाला चालना देण्यास कोणतीच अडचण येणार नाही. असेही प्रशांत यादव म्हणाले.

चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणण्यात आम्ही कुठेच कमी पडणार नाही. याची खात्री मला आहे. राज्यात आणि केंद्रात देखील सत्ता आमची आहे, तसेच वरिष्ठ नेत्यांचे देखील चिपळूणकडे लक्ष आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने सात कलमी कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार आमचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये शहरातील सर्व मूलभूत सुविधांचा समावेश आहे.शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये वाढ करावी लागणार आहे, तसेच महिलांची सुरक्षितता, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार, नगरपालिकेची इमारत, आरक्षित असलेले भूखंड विकसित करणे अशा अनेक विषयावर काम करण्याची गरज असून प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिपळूणला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणे हे येथील नागरिकांचे स्वप्न आहे. प्रचारात नागरिक तशी मागणी करत आहेत आणि स्मार्ट सिटी ही आमच्या सरकारची लोकप्रिय योजना असून अनेक शहरे या योजने अंतर्गत विकसित झाली आहेत. अनेक शहरांचा कायापालट देखील झाला आहे. चिपळूणच्या जनतेने यावेळी पूर्ण ताकदीने, बहुमताने नगरपरिषदेची सत्ता हाती दिली तर स्मार्ट सिटी चे नागरिकांचे स्वप्न पूर्ण करून दाखवू आणि चिपळूण शहराला विकसित शहराच्या यादीत नावलौकिक प्राप्त करून देऊ असा विश्वास भाजप नेते प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page