मान्सूनची वेगाने आगेकूच; ४ दिवसात केरळमध्ये दाखल होणार…

Spread the love

मुंबई- मान्सून या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये दाखल होईल, असा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची वेगाने घोडदौड सुरू आहे. केरळबरोबरच तामिळनाडूमध्ये आणि ईशान्येच्या राज्यांमध्येही मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज आहे.

हवामान विभागाने २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मान्सूनची नैऋत्य आणि ईशान्य या दोन्ही शाखांचा वेगाने प्रवास सुरू असल्याने चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, मालदीव आणि कोमोरिन येथील उर्वरित परिसर, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ, तामिळनाडू, बंगालचा उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग, बंगालच्या उपसागराचा ईशान्येकडचा भाग, ईशान्येकडील राज्ये येथे मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेली प्रणाली किती तीव्र होते आणि त्यामुळे वातावरणातील किती आर्द्रता या प्रणालीकडे खेचली जाते, यावर मान्सूनचा पुढचा प्रवास ठरेल. मात्र, अरबी समुद्रामध्ये बुधवारी चक्रीय वातस्थिती निर्माण होत असून, त्याच्या प्रभावाखाली गुरुवारी, कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रात दिसेल. मुंबई, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली. या काळामध्ये वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page